
बेळगाव : मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राज्यभर मंगळवार, ३० जूनपासून विशेष व्यापक पुनर्तपासणी (एसआयआर) मोहिमेला प्रारंभ होत आहे. या महिनाभर चालणाऱ्या उपक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत.
या प्रक्रियेदरम्यान बीएलओ प्रत्येक कुटुंबाला विहित नमुन्यातील गणना फॉर्म उपलब्ध करून देतील. मतदारांनी अर्जातील माहिती अचूक भरून स्वाक्षरी करायची असून, त्यातील एक प्रत मतदाराकडे आणि दुसरी प्रत निवडणूक प्रशासनाकडे ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाकडे जमा झालेले अर्ज स्कॅन करून डिजिटल स्वरूपात संग्रहित केले जाणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित होणार आहे.
२०२६ च्या आकडेवारीनुसार राज्यातील ५ कोटी ५५ लाख ७४ हजार ६४ मतदार या विशेष पुनर्तपासणीच्या कक्षेत येणार आहेत. या व्यापक मोहिमेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बूथस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त केले असून, हे प्रतिनिधी बीएलओंना माहिती संकलन आणि पडताळणी प्रक्रियेत सहकार्य करणार आहेत.
एसआयआर मोहिमेद्वारे नव्याने पात्र ठरलेल्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. तसेच मृत व्यक्तींची नावे, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे आणि एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंद असलेल्या मतदारांची माहिती पडताळून आवश्यक त्या नोंदी वगळल्या जाणार आहेत. याशिवाय मतदार ओळखपत्रातील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा इतर तपशीलांतील चुका दुरुस्त करण्याची संधीही या मोहिमेमुळे नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
३० जूनपासून सुरू होणारी ही विशेष व्यापक पुनर्तपासणी मोहीम संपूर्ण जुलै महिनाभर राज्यभर राबविण्यात येणार आहे. मतदारांनी बीएलओंना आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देत या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta