
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या लढ्याला दिशा देणारी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू ठरलेली उच्चाधिकार समितीची बैठक आता बुधवार दि. ८ जुलै रोजी मुंबईतील मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ सभागृहात होणार आहे. यापूर्वी ही बैठक ३० जून रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव ती रद्द करण्यात आल्याने सीमाभागात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
बैठक रद्द झाल्यामुळे सीमावासीयांमध्ये शासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आता नव्याने बैठक निश्चित झाल्याने सीमा प्रश्नाच्या लढ्याला पुन्हा गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्नाच्या प्रकरणाची सद्यस्थिती, महाराष्ट्र सरकारची पुढील कायदेशीर रणनीती, तसेच सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे समजते. याशिवाय सीमा लढ्याला अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या बैठकीकडे संपूर्ण सीमाभागाचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta