
बेळगाव : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथे गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती नळांद्वारे दूषित व गटारमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. या गंभीर समस्येचे तातडीने निराकरण न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चव्हाट गल्लीतील नागरिकांनी दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली.
आज पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा करून प्रशासनाला आठ दिवसांचा अवधी देण्याची विनंती केली. या कालावधीत दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाचा मान राखत, उद्या आयोजित करण्यात आलेला नागरिकांचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय चव्हाट गल्लीतील सर्व नागरिकांनी एकमताने घेतला.
मात्र, प्रशासनाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत समाधानकारक व कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही, तर चव्हाट गल्लीतील सर्व नागरिक लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून निश्चित मुदतीत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Belgaum Varta Belgaum Varta