
पाणीटंचाई, पथदिप, अस्वच्छतेबाबत बाबत नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी उपनगरातील शाहूनगर व आश्रयनगर परिसरात पाणीटंचाई, बंद पथदिप आणि अस्वच्छतेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्या त्वरित सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत नागरिकांनी देऊन आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची माहिती अशी, शाहूनगर आणि आश्रयनगर या दोन्ही भागांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ३ हजार असून पाणीपुरवठ्यासाठी केवळ दोन कुपनलिका उपलब्ध आहेत. त्यापैकी प्रगतीनगर, शाहूनगर येथील एक बोअरवेल अनेक गल्लींना पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र पाईपलाइन खराब झाल्याने आश्रयनगरमध्ये पाणी पोहोचत नाही. शाहूनगर येथील दुसऱ्या कुपनलीकेद्वारे केला पूर्ण क्षमतेने कार्यरत नसून त्यामध्ये माती साचल्याने खोली केवळ १०० फूटपर्यंत राहिली आहे. परिणामी फक्त एक-दोन गल्लींनाच पाणी मिळत आहे. नगरपालिकेचे पाणी आठवड्यातून केवळ एकदाच येत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने आणखी दोन कुपनलीका सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाहूनगर, प्रगतीनगर व आश्रयनगर परिसरातील रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. शाहूनगर व आश्रयनगर भागात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत असून साप व इतर उपद्रवी प्राण्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळी वातावरणामुळे दुर्गंधी वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
नगरपालिकेने या सर्व गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी प्रा. आर. के. दिवाकर, विश्वनाथ जाधव, रवींद्र इंगवले, शगणपती गोसावी, दादासाहेब खोत, विनायक माने, गजानन कांबळे, किशोर जाधव, सचिन नाईक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta