
खानापूर : बेळगाव – गोवा (अनमोड) महामार्गावरील वरकडा (ता. खानापूर) गावाजवळ गुरुवारी सकाळी एनडब्ल्यूकेआरटीसीची बस चिखलात अडकल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, तर महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
मुसळधार पावसामुळे वरकडा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत बस रस्त्याच्या मध्यभागी अडकल्याने बेळगाव–गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गावर दररोज शेकडो मालवाहू तसेच प्रवासी वाहने धावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची अशीच अवस्था होत असतानाही कायमस्वरूपी दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रस्त्यावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी स्थानिकांसह प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, रस्त्याची त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta