
खानापूर : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आज आरोग्य भारती बेळगाव व खानापूर शाखेतर्फे खानापूर, हलशी, बीडी व परिसरात १९८०–९० च्या दशकातील दुर्गम भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध नसलेल्या काळात एम.बी.बी.एस. पदवी संपादन करून आपल्या मातृभूमीत गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ निःस्वार्थ भावनेने वैद्यकीय सेवा करणारे वैद्यकीय त्रिरत्न डॉ. सुधीर नाईक, डॉ. शिवाजी के. पाटील आणि डॉ. व्ही. एस. जावळी यांचा कदंबकालीन पवित्र श्री भुवराह लक्ष्मी नरसिंह पुण्यक्षेत्र, हलशी येथील डॉ. सुधीर नाईक यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आरोग्य भारती बेळगाव जिल्हा उपाध्यक्षा सौ. हेमा अंबेवाडीकर व सौ. माया कोष्टी यांच्या हस्ते तीन वेळा ओमकार पठण व श्री धन्वंतरी स्तवनाने झाली.
आरोग्य भारती कर्नाटक उत्तर प्रांताचे उपाध्यक्ष वासुदेव इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आरोग्य भारतीच्या “स्वस्थ समाज” या मूलभूत ध्येय-उद्दिष्टाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
बेळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिजरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून ज्येष्ठ डॉक्टरांचा परिचय करून दिला व त्यांच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेचा गौरव केला.
सत्कारमूर्ती डॉक्टरांनी त्या काळातील रुग्णसेवेचे अनुभव, मर्यादित साधनसामग्रीतही केलेली सेवा आणि कठीण परिस्थितीत निभावलेली वैद्यकीय जबाबदारी याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या अनुभवपूर्ण आठवणी ऐकून उपस्थितांना “वैद्यो नारायणो हरिः” या उक्तीची प्रचिती आली.
या प्रसंगी उपस्थित असलेले आरोग्य भारती खानापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा, उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन सुळकर आणि डॉ. राधाकृष्ण हारवाडेकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. सुधीर नाईक व सौ. सुमा नाईक तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी सर्व मान्यवर व उपस्थित पाहुण्यांचे अत्यंत आदरपूर्वक स्वागत व आदरातिथ्य केले. त्यामुळे कार्यक्रमाला भावनिक व आनंददायी वातावरण लाभले. प्राचीन परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेल्या लाकडी कलाकुसरीने सजलेल्या प्रशस्त व नंदनवनासारख्या घराने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
लक्ष्मण शेट्टी यांनी आभार प्रदर्शन केले, तर संजय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Belgaum Varta Belgaum Varta