

पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट रोजी 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून किल्ले प्रतापगड येथे सीमाप्रश्नी जागृती करण्यात आली.
यावेळी तुळजाभवानी मंदिरात जाऊन पूजा,आरती व प्रार्थना करून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी साकडे घालण्यात आले. 15 ऑगस्ट हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेक पर्यटक किल्ले प्रतापगडावर उपस्थित होते. या दरम्यान “बेळगाव, कारवार निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय”च्या घोषणांनी पर्यटकांनी परिसर दणाणून सोडला, महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या पर्यटकांना सीमाभागात 1956 साली भाषांवर प्रांतरचना करतांना झालेला अन्याय तसेच गेली सत्तर वर्षे सीमावासीयांवर कर्नाटक सरकारकडून होणारे भाषिक अत्याचार, दाखल होणारे विविध खोटे गुन्हे याबद्दल माहिती दिली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे वाई तालुका अध्यक्ष प्रताप जाधव यांनाही सीमावासियावर होणाऱ्या अन्यायाची माहिती देण्यात आली, प्रताप जाधव यांनी महाराष्ट्रातील जनतेला व राजकीय नेत्यांना सीमाप्रश्नी जागृत करण्याचे आश्वासन दिले.
याच बरोबर बेळगावातील 1986 च्या कन्नडसक्ती आंदोलनात सहभागी झालेले व तुरुंगवास भोगले वाई येथील प्रसिद्ध मिसळ जॉली हॉटेलचे मालक 80 वर्षीय मनोहर त्रिंबक पटवर्धन यांचीही भेट घेण्यात आली.
यावेळी पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे विश्वनाथ पाखरे,
अजित कुमठेकर, रामदास पाखरे, पंकज दास, नागराज पाखरे, जगन्नाथ, रवी व अनेक पर्यटक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta