

लखीसराय : श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारी बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
श्रावण सोमवारनिमित्त भगवान शिवाला जलाभिषेक करण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती. याचदरम्यान मंदिर परिसरात वीजेची तार किंवा खांब पडून वीजप्रवाह झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे भाविकांमध्ये अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी एकाच वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
या गोंधळात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. गर्दीच्या दबावामुळे अनेक भाविक एकमेकांच्या अंगावर पडले. यात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर अनेक भाविक जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. घटनेनंतर मंदिर परिसरात प्रशासन व पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta