
शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; ७ हून अधिक जण जखमी
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबादजवळ चिरागपल्ली-सत्वार राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ऑटोचालकासह सहा जणांचा मृत्यू झाला. शेतीचे काम आटोपून ऑटो रिक्षातून आपल्या गावाकडे परतणाऱ्या मजुरांच्या ऑटोला भरधाव टँकरने जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता एवढी होती की ऑटो रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात ऑटोचालकासह पाच शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मृत सर्वजण बीदर जिल्ह्यातील राजगिरी गावचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. अपघातात सातहून अधिक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जहीराबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताच्या कारणांचा तसेच टँकर चालकाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta