
देसूर : देसूर गावातील मुख्य रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्लास्टिक, कचरा आणि साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, महिला, लहान मुले तसेच पादचाऱ्यांना याच घाणीतून मार्ग काढावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून ही समस्या कायम असून, वारंवार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणूनही अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गटारीचे पाणी रस्त्यावर साचल्याने चिखल आणि घाण निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास होत असून, घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, रोगराई पसरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायतीकडे अनेकवेळा तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ‘कुणाचा तरी बळी गेल्यानंतरच ग्रामपंचायत जागी होणार का?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायतीने तातडीने गटारींची साफसफाई करून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा तसेच भविष्यात ही समस्या उद्भवणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनानेही या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta