बेळगाव : हुतात्मा दिनाच्या अभिवादन कार्यक्रमादिवशी समितीतील स्वयंघोषित गटाच्या एका नेत्याने सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा अश्या पद्धतीची वलग्ना केली. वस्तुस्थिती अशी आहे की 2006 साली वकील राम आपटे आणि वकिल वसंत भंडारे यांच्यामार्फत न्यायालयात रिटपिटिशन दाखल करण्यात आले होते. पण 2007 साली हे रिटपिटिशन न्यायालयाने निकाली काढताना सीमाप्रश्नांचा मुख्य दावा सर्वोच्च न्यायालयात आहे, त्याची सुनावणी चालू होणार आहे त्यामुळे हा दावा निकाली काढण्यात येत आहे असे सांगत पिटिशन रद्द केले. याप्रसंगी न्यायालयात ऍड. राम आपटे, वसंत भंडारी, दिनेश ओऊळकर, किरण ठाकूर, प्रसाद ठाकूर हजर होते. ही वस्तुस्थिती माहीत असतानाही केवळ अडेलतट्टूपणा करून तीच तीच मागणी परत केली जात आहे. हे मुख्य दाव्याला घातक आहे.
हुतात्म्यांना अभिवादन करण्यास आलेल्या आपल्या गटातील काही व्यक्तींना पढवुन आणून कायद्याची कलमं सांगत परत केंद्रशासितचं आणि राष्ट्रपती राजवटीचे तुणतूणं चालू केलं आहे. साडे चार वर्षे कोमात असणारी ही मंडळी निवडणुका लागताच जोमात येतात आणि पेपर बहाद्दर होण्यासाठी चुकीच्या लोकांची तळी उचलायला लागतात. पाच वर्षांपूर्वी मागील विधानसभा निवडणुकीत आपल्या सपाटून मार खाल्लेल्या उमेदवारांचा अपमान पुसून काढण्यासाठी आता पोकळ बांबूचा वापर चालू केला आहे. सालाबाद प्रमाणे याही वेळी दोन वेगवेगळ्या गटात हुतात्म्यांना अभिवादन केलं गेलं, काहींनी तर नेत्याला आवडावे म्हणून दोनवेळा अभिवादन केले. दिगंबर पाटील गट खानापूर वरून एकटाच आला आणि खानापूर समितीतील एकीचा झालेला विचका अधोरेखित करून गेला.
निवडणुका आल्या की अनेकांना आमदारकी, खासदारकीची स्वप्न पडतात. अशा स्वप्नाळू नेत्यांची संख्या आता वाढत चालली आहे. शिवसेनेचा एकांगी पडलेला नेता महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांना या उपटसुभांना नेऊन भेटवत आहे आणि आपण ‘प्रकाशमान’ होण्याचा प्रयत्न करत आहे. संजय राऊतांच्यासमोर काही नेत्याच्या बेताल वक्तव्यामुळे ‘समितीत एकी नाही, समिती नको आता आम्हीच इलेक्शन लढवतो’ असे संजय राऊत उद्वेगाने बोलले होते. त्यांनी काही जणांची केलेली कानउघाडणी गुलदस्त्यात आहे.
आपली आर्थिक संस्था अडचणीत आली म्हणून पुण्याला घेऊन जाणारा नेता बेळगावातील सगळी व्यासपीठं आपलीच व्हावी या महत्वाकांक्षेने पछाडल्याने, नेहमीचीच जुनी समीकरणं वापरत आहे. जी संस्था आपल्या हातात येत नाही तिथली काही माणसे फितवणे, काही माणसे तिथे घुसवणे आणि त्यांना चिथावणी देत मूळ त्या संस्थेतील माणसानाच तिथून बाहेर काढणे, बाटक्या टग्यांना घेऊन ही खेळी समितीवरही लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे. निद्रिस्त समिती नेत्यांनी यावर नीट विचार करणे गरजेचे आहे.
समिती ही बहुजनांची आहे, ती बहुजनांचीच राहिली पाहिजे ही काळाची गरज आहे. ज्या पद्धतीने ते समिती गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना उत्तर म्हणून समितीतील नेत्यांनी आता ठाकूर ‘ये हात मुझे दे दो’ म्हणण्याची गरज आहे.
समिती आणि सीमालढा बहुजनांच्या त्यागावर व बलिदानावर उभा आहे. याला कोण नख लावेल त्याला सडेतोड उत्तर देणे आता काळाची गरज आहे. आमदार, खासदारकीची स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांना सीमाप्रश्न महत्वाचा की सत्ता महत्वाची हे समजावून सांगणे गरजेचे आहे. हिंदुत्ववाद कणखर नेता समितीच्या मुख्य प्रवाहात आल्यामुळे काहीजण हतबल झाले आहेत. त्याविषयी पुढे……
क्रमशः
