Thursday , June 4 2026
Breaking News

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना

Spread the love

कोल्हापूर जिल्ह्यातून नाम.चंद्रकांतदादा पाटील आणि श्री.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

कोल्हापूर : सन १९५६ मध्ये निपाणी, बिदर, बेळगाव या शहरासह 865 खेड्यांचा समावेश कर्नाटक राज्यात करण्यात आला. सीमाभागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला. भाषिक बहुसंख्य मुद्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या. मात्र बेळगाव सीमाप्रश्नात हा मुद्दा विचारातच घेण्यात आला नाही, असं आजही म्हटलं जातं. त्यातून सीमावादाचा लढा उभा राहिला. तेव्हापासून मराठी भाषिक जनतेचा सीमाप्रश्नाचा सुमारे ६६ वर्षांचा हा लढा सुरू आहे. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून, राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीची पुनर्रचना आज दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयाने करण्यात आली. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागामार्फत उपसचिव श्री. ज. जि. वळवी यांनी हा शासन आदेश पारित केला आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातून उच्च, तंत्र शिक्षण मंत्री ना. मा. श्री.चंद्रकांतदादा पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासनाने पुनर्रचना केलेल्या समितीच्या अध्यक्ष पदी मुख्यमंत्री ना.मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्यासह सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खास. श्री. शरद पवार, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री मंत्री आम.श्री.पृथ्वीराज चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री शालेय शिक्षण मंत्री ना.श्री. दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, कामगार मंत्री ना.श्री.सुरेश खाडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.श्री. तानाजी सावंत, सा.बा.मंत्री ना.श्री.रविंद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.श्री. शंभूराजे देसाई, माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते श्री.अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासनाने पुनर्रचना केलेल्या समितीची मुख्यमंत्री ना.मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता सह्याद्री राज्य अतिथिगृह, मुंबई येथे बैठक पार पडणार असल्याची माहिती समितीचे सदस्य राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *