बेळगाव : बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात येते. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषिक नागरिक या महामेळाव्यात सहभागी होईल, असा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई पॅलेस येथे पार पडली. बैठकीच्याचे अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ठ नेते बी. ओ. येतोजी हे होते. बैठकीमध्ये महामेळावा यशस्वी करण्याबरोबरच शहर समितीची पुनर्रचनेवर वादळी चर्चा झाली. चर्चेअंती कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार समितीची पुनर्रचना करण्याचे सर्वाधिकार युवा कार्यकर्ते तसेच समिती कार्यकारिणी सदस्य मदन बामणे यांना देण्यात आले आहेत. समितीकडे नवीन कार्यकर्त्यांचा वाढता ओढ लक्षात घेऊन शहर म. ए. समितीने त्यांना सामावून घ्यावे अशी मागणी काय मागील काही दिवसांपासून जोर धरून होती. निवडणुकीच्या काळात शहर म. ए. समितीने 250 कार्यकर्त्यांची एक यादी तयार केली होती. या यादीतून शहर म्हणून समितीची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा घेणार हे निश्चित आहे. गुरुवारी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यानी पोलीस प्रशासन तसेच इतर यंत्रणांना परवानगीचा अर्ज दिला आहे. मात्र पोलिस आयुक्त सिद्धारामप्पा यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीकडून परवानगीचा अर्ज आल्या नसल्याचे सांगितले आहे. मात्र पंधरा दिवसांपूर्वीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगीचा अर्ज दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी संभ्रमावस्थेत न राहता महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन समिती नेते प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
यावेळी बोलताना खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्यात समितीनिष्ठा भिनली पाहिजे. प्रशासनाने परवानगी दिली अगर नाकारली तरी देखील हा महामेळावा यशस्वी होणारच. जर प्रशासनाने जबरदस्तीने महामेळावा होऊ दिला नाही तर शक्य तिथे ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी बैठकीला सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुसकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, सागर पाटील, मदन बामणे, अमित देसाई, मोतेश बारदेशकर, प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, रणजीत हावळनाचे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहर समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.