बेळगाव : जिल्ह्यासाठी यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग, रिंगरोड, घनकचरा व्यवस्थापन युनिट, चोवीस पाणी योजना (24×7) यासह जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या मोठ्या प्रकल्पांशी कामांची माहिती दिली. त्याचबरोबर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील महत्त्वाचे विकास कामे आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्या आणि विकास कामे करा, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव महापालिकेत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
बुधवार दि. 19 जून रोजी महापालिकेच्या कार्यालयात झालेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी काही ठिकाणी विकास कामांना स्थानिकांचा विरोध होतो. अशा वेळी स्थानिकांचे मन वळवले पाहिजे. प्रसंगी आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्तात कामे सुरू ठेवावीत, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
भूसंपादन आणि स्थानिकांचा विरोध यामुळे काही प्रकल्प दहा वर्षांपासून रखडले आहेत. त्यामुळे जनतेला चांगल्या सुविधा देणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली सर्व कामे पूर्ण करावीत. डेंग्यू आणि कॉलरा नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. भ्रूणहत्येवर बारिक लक्ष ठेवले पाहिजे.
अखंड पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी ठेकेदार संस्थेच्या अधिकाऱ्यांना दिले.
जुना पी. बी. रोड, सिव्हिल हॉस्पिटलजवळील कामानंतर रस्ता व पाईप लाईनची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे जनतेला त्रास होत असल्याबद्दल आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी नाराजी व्यक्त केली.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उड्डाणपुलाचा सुधारित आराखडा सादर करण्याची सूचना केली.