येळ्ळूर परिसराच्या आजच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासामध्ये येळ्ळूरच्या मराठी मॉडेल स्कूल, येळ्ळूर या शाळेचे फार मोठे योगदान आहे. येळ्ळूर परिसर हा बेळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विकासामध्ये अग्रेसर आहे. याचे संपूर्ण श्रेय मराठी मॉडेल स्कूलला जाते. यामुळे या भागाच्या शैक्षणिक, सामाजिक विकासाचा जणू दीपस्तंभच ठरावा अशा त-हेचे उल्लेखनीय कार्य या शाळेने गेल्या दीडशे वर्षांमध्ये सातत्याने केले आहे.
मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर या शाळेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व संस्थानिक काळात 1874 साली झाली. आज शाळेच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने येळ्ळूरचे शिक्षण प्रेमी गावकरी तसेच शाळेचे आजी-माजी विद्यार्थी यांच्या वतीने या शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव यावर्षी भव्य दिव्य अशा पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थित साजरा करायचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने या शाळेचा वैभवशाली इतिहास संक्षिप्त रीतीने देत आहे.
येळ्ळूर हा गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील कुरुंदवाड जुनियर संस्थानाच्या अखत्यारीत होता. संस्थानातील एक मोठे गाव असल्याने संस्थानातील तालुक्याचा गाव समजला जात होता. या तालुक्यामध्ये या परिसरातील 22 खेड्यांचा समावेश होता. त्या काळापासूनच येळ्ळूरची ही शाळा तालुक्याची शाळा अशीच या शाळेची ख्याती होती. या परिसरातून सर्व खेड्यांचे विद्यार्थी इयत्ता चौथी, पाचवी नंतरचे शिक्षण या शाळेतूनच घेत होते, त्यामुळे या शाळेला सुरुवातीपासूनच मानाचे स्थान प्राप्त झाले होते. या ठिकाणी कार्य करणाऱ्या तत्कालीन शिक्षकांनी शाळेचा दर्जाही सुरुवातीपासूनच चांगला राखला होता, त्यामुळे या भागातील एक दर्जेदार शाळा अशी ख्याती होती.
या शाळेच्या विकासामध्ये अपार कष्ट घेऊन बेळगाव परिसरातील एक उत्तम दर्जाची शाळा असा लौकिक प्राप्त करून दिला. त्यामुळेच या शाळेच्या विकासाचा कळस त्यांनी उभारला असे म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याच्या दृष्टीने आणि समाजसेवी वृत्तीचे विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने फार मोठे कार्य गावडू मास्तरांनी केले. शाळेतील मुख्याध्यापक पदाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या छडीचा फार मोठा दरारा होता. गावडू मास्तरांची छडी असे नाव जरी उच्चारले तरी विद्यार्थ्यांचा थरकाप उडायचा आणि त्यांच्यातील बेशिस्त, चुकारपणा लोप पावून अत्यंत शिस्तप्रिय असे अभ्यासू विद्यार्थी त्यांच्या हातून घडले जायचे. त्यांनी गावातील आणि परिसरातील अनेक उत्तम विद्यार्थी घडविले, या विद्यार्थ्यांनी पुढे चांगले कर्तृत्वही दाखवले.
मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की माझे शिक्षण कै. गावडू गुरुजींच्या मुख्याध्यापकत्वाखाली झाले, यावेळी अत्यंत उत्तम दर्जाच्या शिक्षकांचं मार्गदर्शनही मला लाभलं. 1950 साली मी या शाळेत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश केला व सलग सात वर्ष मी या शाळेत शिक्षण घेतलं. यावेळी आदर्श शिक्षक कै. हु. व. बिर्जे गुरुजी, कै. ज्योतिराव मुरकुटे गुरुजी, कै. श्रीमती साधले, कै. मुंगुरडेकर गुरुजी, कै. हलगेकर गुरुजी आदींच अत्यंत मोलाचं मार्गदर्शन लाभलं, त्यामुळेच माझ्या आयुष्याची एक चांगली घडण या ठिकाणी घडली असं म्हणावं लागेल. कै. बिर्जे गुरुजींनी तर आपल अमूल्य असं बोधामृतच आम्हा विद्यार्थ्यांना पाजलं, त्यामुळे माझ्याबरोबरच कै. एन डी पाटील, कै. आर. जी. पाटील, कै. एस. के. पाटील यांच्यासारखे अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी तयार झाले. कै. बा. रा. सांबरेकर गुरुजींनी चांगले कर्तृत्ववान विद्यार्थी घडविले.
या शाळेची स्थापना कुरुंदवाड सरकारच्या तत्कालीन तालुका कचेरीत झाली. त्या ठिकाणाला पुढे पूर्णपणे शाळेचे स्वरूप आले व संस्थानच्या कार्यालयात तत्कालीन संस्थानचे कारभारी कै. शंकरराव कुलकर्णी यांच्या घरामध्ये हलविण्यात आले. पुढे या शाळेचा पहिला जिर्णोद्धार माझ्या माहितीप्रमाणे 1958 ते 60 च्या दरम्यान येळ्ळूर ग्रामपंचायतचे तत्कालीन अध्यक्ष कै. ना. जो. घाडी यांच्या आमदानीत झाला व शाळेला एक चांगले स्वरूप प्राप्त झाले. त्यांनीच या इमारतीचे काम घेण्यात पुढाकार घेऊन मोठे योगदान दिले. यावेळचा खर्च ज्ञात नसला तरी अत्यंत सुबक अशी कौलारू इमारत नव्याने उभारण्यात आली. त्यानंतर 2002 साली तत्कालीन मुख्याध्यापक श्री. एल. एन. कंग्राळकर व याच शाळेचे निवृत्त शिक्षक कै. हु. व. बिर्जे गुरुजी यांच्या पुढाकाराने करण्यात आला. यामध्ये जिर्णोद्धारचा खर्च सरकारी अनुदान सुमारे दहा लाख रुपये, गावकरी व शिक्षण प्रेमींच्या देणग्या सुमारे पाच लाख रुपये, जुन्या साहित्याचा लिलाव व अन्य मार्गाने जमा रक्कम अशा सुमारे १५ लाखातून करण्यात आला आणि आजची शाळेची अत्यंत सुसज्ज व सुबक इमारत उभी राहिली. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने इमारतीत जागा अपुरी पडली व अनेक वर्षे पहिली ते चौथी चे वर्ग श्री चांगलेश्वरी मंदिरच्या सुसज्ज इमारतीत चालविण्यात आले. या शाळेच्या उभारणीचे संपूर्ण श्रेय या दोन व्यक्तींबरोबरच त्या वेळच्या दानशुर नागरिकांना जाते.
अलीकडच्या काळात 2023-24 दरम्यान आमदार अभय पाटील साहेब यांनी मंजूर केलेल्या 25 लाख रुपये निधीतून शाळेला लोखंडी पत्र्यांचे छत उभारण्यात आले आहे. तसेच दहा लाख रुपये निधीतून इमारतीला फरशी, स्लाइडिंग खिडक्या, दरवाजे, पॅरापेट ग्रिल बसविण्यात आले आहेत.
नियोजित क्रीडांगण
शाळेला क्रीडांगण नसल्यामुळे अनेक वर्ष क्रीडांगणाविना मोकळ्या जागेचा उपयोग करून क्रीडांगणाची गरज भागवण्यात आली. बरीच वर्षे गावच्या स्मशानानजीकच्या मोकळ्या जागेचा क्रीडांगणासाठी उपयोग करण्यात आला. पुढे या जागेमध्ये सरकारी मुलींची शाळा (समिती शाळा) व जनावरांचा दवाखाना झाल्याने या जागेचाही वापर बंद झाला. यावर्षी गावातील मध्यवर्ती जागेत म्हणजे लक्ष्मी गल्ली आणि प्रताप गल्ली यांच्यामध्ये असलेल्या तलावाची जागा ग्रामपंचायतीने शाळेच्या क्रीडांगणासाठी मंजूर केली आहे. त्याला सरकारी मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या नियोजित क्रीडांगणासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालकमंत्री मान. सतीश जारकीहोळी साहेब यांनी आमदार फंडातून 25 लाख रुपयाचा भरीव निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर येळ्ळूर ग्रामपंचायतच्या वतीने सरकारच्या नरेगा योजनेतून 35 लाख रुपयाचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीतून तलाव भरून काढून सुसज्ज असे स्टेडियमधर्तीवरील मैदान उभारण्यात येणार आहे. हा निधी मिळवण्यासाठी माजी मुख्याध्यापिका सौ. शोभा निलजकर, विद्यमान मुख्याध्यापक राजेंद्रकुमार चलवादी तसेच शाळेच्या शाळा सुधारणा समिती व निधी समिती यांनी विशेष परिश्रम घेतले. यामुळे शाळेची व पर्यायाने गावची मध्यवर्ती क्रीडांगणाची गरज दूर होणार आहे. लवकरात लवकर हे क्रीडांगण उभारले जावो, ही सदिच्छा.
या शाळेचा प्रभावशाली इतिहास कथन करत असताना अत्यंत अभिमान वाटावा अशा पद्धतीच्या थोर व्यक्ती. समाजसेवक या शाळेने निर्माण केले आहेत. त्यातील मोजक्याच व्यक्तींचा उल्लेख करून या शाळेचे योगदान जगासमोर मांडायचा प्रयत्न करीत आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी
या शाळेचे एक विद्यार्थी, संत कै. गोविंदराव मेलगे हे स्वतः कमी शिक्षित राहूनही फार मोठी समाजसेवा त्यांनी त्या काळात घडविली. ते उत्तम किर्तनकार होते. किर्तनातून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक जागृती केली. शिवाय त्यांनी हल्ल्याळ तालुक्यात ७ शाळा सुरु केल्या. त्यांनी आपले कार्यक्षेत्र खानापूर तालुक्यातील नंदगड विभाग व हल्याळ तालुका निवडले आणि त्या भागात मोलाचे शैक्षणिक कार्य सुरू केले. त्यांनी स्थापन केलेली पहिली मराठी प्राथमिक शाळा आजही नंदगड येथे त्यांच्या नावाने उभी आहे. दुसरे या येळ्ळूर गावचे थोर सुपुत्र आणि या शाळेचे माजी विद्यार्थी ‘राष्ट्रवीर’ कार गुरुवर्य शामराव देसाई यांनी तर समाजासाठी फार मोठी सेवा केली. बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समितीच्या वतीने जिल्ह्यात 289 प्राथमिक शाळा, 25 रात्र शाळा, बेळगाव शहरातील खासबाग येथे भारती विद्यालय व हुक्केरी तालुक्यातील सुंदराबाई भांदुर्गे हायस्कूल, दड्डी यांची स्थापना करून संपूर्ण ग्रामीण भागाला सुशिक्षित करायचे व्रत घेऊन या भागाचा शैक्षणिक विकास केला. पुढे संस्थेच्या प्राथमिक शाळा त्यांनी सरकारला हस्तांतरित केल्या. त्यांनी समाजसेवा आणि जागृतीसाठी स्थापन केलेल्या संस्था पाहिल्या तर त्यांच्या कार्याची प्रचिती येते. समाजसुधारणा मंडळ 1923, साप्ताहिक ‘राष्ट्रवीर’ची स्थापना 1933, सत्यशोधक चळवळीला प्रारंभ 1930, तुकाराम अर्बन बँक शहापूर 1934, मराठा को-ऑप बँक 1942, त्याचबरोबर त्यांनी शेतकरी कामगार संघ, संतसेना महाराज समाजोन्नती संघ, विणकर खरेदी विक्री सहकारी संघ अशा संस्थांचीही स्थापना करून सर्व समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाचा पाया घातला त्यातून त्यांच्या कार्याचे मोठेपण ठळकपणे दिसून येते.
या शाळेचे कर्तबगार माजी विद्यार्थी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी बेळगावचे राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्र गाजविलेले आहे. स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या कर्तृत्वावर ते आमदार झाले. त्याचबरोबर त्यांनी विश्वभारत सेवा समिती या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून बेळगाव शहर बेळगाव व खानापूरच्या ग्रामीण भागात माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज स्थापन करून फार मोठा शैक्षणिक विकास घडविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून तयार होऊन मी स्वतःची चांगळेश्वरी शिक्षण मंडळ या नावाने संस्था स्थापन करून येळ्ळूर व खानापूर तालुक्यात दर्जेदार शाळा चालवित आहे. येळ्ळूर येथे श्री चांगळेश्वरी हायस्कुल, इंग्रजी माध्यमाच्या धर्तीवर मराठी माध्यमातून श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कुल तसेच बालोद्यान (LKG-UKG) ही शैक्षणिक केंद्रे चालविली आहेत. तसेच खानापूर तालुक्यातील जंगल भागात श्री रवळनाथ हायस्कुल शिवठाण, श्री ज्ञानेश्वर विद्यालय लोकोळी, गणेबैल हायस्कुल गणेबैल, कारलगा हायस्कुल, कारलगा व मणतुर्गा हायस्कूल, मणतुर्गा या दर्जेदार माध्यमिक शाळा उत्तमरित्या चालवून दुर्गम भागाचा शैक्षणिक-सामाजिक विकास साधला आहे. याच शाळेचे बालशिवाजी वाचनालय व राष्ट्रभाषा हिंदी विद्यालयचे संस्थापक कै. लक्ष्मण आप्पाजी पाटील (पंडितजी) यांनी फार मोठी शैक्षणिक सेवा केलेली असून हिंदीच्या शिक्षणाची आवड या भागात निर्माण करून शैक्षणिक केंद्रामार्फत हिंदी राष्ट्रभाषेच्या समकक्ष पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय केली. त्यांनी कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव व प्राध्यापक म्हणूनही कामगिरी बजावली. कै. बा. वी. पाटील यांनी बाल शिवाजी वाचनालय आणि हिंदी महाविद्यालय या संस्थांचे पंडितजी यांनी चालू केलेले कार्य अनेक वर्ष पुढे चालू चालविले असून त्यांनी हिंदी महाविद्यालय मार्फत अनेक विद्यार्थी घडविले. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबाजी भावे यांचा सहवास लाभलेले या भागातील भूदान चळवळीचे नेते कै. रामचंद्रराव कदम (कदमजी) यांनी स्वतःची जमीन भूदान करून या चळवळीबद्दल जागृती निर्माण केली. तसेच विश्वभारत सेवा समितीच्या कार्यातही सहभाग घेतला. येळ्ळूरचे सुपुत्र व म्हापसा-गोवा येथील ढेपे कॉलेजचे निवृत्त प्राचार्य वाय. एन. मेणसे यांनी बीड-कोल्हापूर येथे सद्गुरु शिक्षण संस्थेची स्थापना करून हायस्कूल व कॉलेज चालविले. डॉ. आर. जी. मेणसे यांनी समाज शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्र हायस्कूल या नावाने एक दर्जेदार हायस्कूल चालविलेले आहे. तसेच त्यांचे गावच्या वेशीतील बालशिवाजी वाचनालयाच्या भव्य इमारतीच्या उभारणीत मोठे योगदान आहे. कै. डी. बी. मोहिते-पाटील यांनी कोल्हापूर येथे ग्रामविकास संस्थेची स्थापना करून कोल्हापूर शहर व ग्रामीण भागामध्ये चांगली शैक्षणिक सेवा घडविली असून कोल्हापूर भागात लौकिकास पात्र झाले आहेत. कै. के. पी. हुंदरे यांनी जनता शिक्षण संस्थेची स्थापना करून बेळगाव येथे रंगुबाई भोसले या शाळेची स्थापना केली.
येळ्ळूरचे पहिले न्यायाधीश कै. अमृतराव पाटील यांनी कोल्हापूर, इस्लामपूर आदी ठिकाणी न्यायाधीश या नात्याने कामगिरी बजावली आहे. त्यांचे तत्कालीन सहकारी कै. मल्लेशअप्पा नंदी यांनी रत्नागिरी, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पुणे, चिपळूण आदी ठिकाणी तहसीलदार म्हणून कार्य केले. कै. बाबुराव देसुरकर, कै. एन. वाय. पाटील, कै. गंगाधर पाटील, कै. मऱ्याप्पा इंगळे (कोल्हापूर), कै. मारुती मंगनाईक (रत्नागिरी) आर्दीनी महसूल खात्यामध्ये वरिष्ठ अधिकारी या नात्याने चांगली सेवा बजावली आहे. या शाळेचे विद्यार्थी यशवंत सुळेभावी हे बेळगावमधील एक ख्यातनाम वकील म्हणून कार्यरत आहेत. तसेच हनुमंत बळवंत पाटील, चंद्रकांत बाबुराव पाटील यांनी बँक अधिकारी म्हणून निवृत झाल्यावर बेळगाव न्यायालयात वकिली व्यवसाय चालवितात. कै. रामचंद्रराव हंगिरकर यांनी महाराष्ट्रात BDO तर, रामचंद्र नंद्याळकर (देसाई), झम्पाण्णा नांदुरकर व कै. शांताराम कदम यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात सेवा बजावली. कै. हुवाप्पा मेणसे यांनी ग्रामलेखापाल, कै. वाय. के. सांबरेकर यांनी तालुका पंचायत विकास अधिकारी म्हणून कार्य केले.
माझे वर्गमित्र कै. एन. डी. पाटील यांनी पंजाब बँकेचे मुख्य अभियंता म्हणून कार्यभार सांभाळला असून, कै. आर. जी. पाटील व कै. बी. वाय. बस्तवाडकर (खादरवाडी) यांनी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून उत्तम कामगिरी बजाविली आहे.
आमचे तत्कालीन गुरु कै. जी. व्ही. पाटील यांनी साखरवाडी सातारा येथे साखर कारखान्याचे केमिस्ट म्हणून सेवा बजावली. तर रामचंद्र सुळगेकर यांनी विवेकानंद सोसायटी कोल्हापूर येथे संचालक म्हणून सेवा बजावून लोणी काळभोर, पुणे येथे हायस्कूल व कॉलेज उभारून शैक्षणिक सेवा बजावली. त्यांचेच पुतणे अरुण सुळगेकर यांनी सासवड (पुणे येथे माध्यमिक शाळेत सेवा बजावत राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करून गावचा लौकिक वाढविला आहे. निवृत्त प्राध्यापक आर. एल. नांदुरकर हे सांगरुळ शिक्षण संस्था, कोल्हापूर या संस्थेचे सचिव या नात्याने कार्यरत आहेत. प्रा. देवकुमार जाधव व कै. वसंतराव जाधव यांनी कोल्हापूर येथील विवेकानंद संस्थेमध्ये तसेच शामराव नाना पाटील यांनी वाई येथे चांगली सेवा बजावली. प्रा. महादेव कानशिडे यांनी बी. ए. मध्ये भूगोलशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळविले व नंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्राचार्य म्हणून सेवा बजाविली. कै. एन. आर. काटकर यांनी गोवा येथे आदर्श शिक्षक म्हणून सेवा बजाविली. श्रीकांत पाटील हे नेमव्वा कुडची पीयू कॉलेजच्या प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. संपत बाबुराव पाटील व जयवंत घाडी हे दोघेही इन्कम टॅक्स खात्यात वरिष्ठ अधिकारी होते. कै. नारायण सांबरेकर यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे कार्यकारी अभियंता या नात्याने सेवा बजावली, तर कै. डी. आर. पाटील यांनी बंगलोर येथे कार्यकारी अभियंता म्हणून सेवा बजावली. बाबुराव सांबरेकर यांनी महाराष्ट्रात अभियंता म्हणून सेवा बजावली.
कै. एस. के. पाटील यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता म्हणून कामगिरी बजावली. त्यांचे बंधू के. के. पाटील यांनीही अभियंता म्हणून कार्य केले आहे. कै. बाबुराव सुतार हे कोयना प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प अधिकारी होते. सतीश बापू पाटील यांनी पुणे येथे एका प्रसिद्ध कंपनीत अभियंता म्हणून सेवा बजाविली. बेळगाव परिसरात मदन सांबरेकर, हनुमंत कुगजी आदी अभियत्यांनी आपले स्वतंत्र व्यवसाय चालविले आहेत. कोल्हापूरचे प्रसिद्ध कंत्राटदार वाय. ए. पाटील व कै. बी. के. पाटील यांनी चांगले नाव कमविले आहे. त्याचबरोबर या शाळेचे अनेक विद्यार्थी बांधकाम व्यवसायात अग्रेसर आहेत. तसेच हजारो माजी विद्यार्थी भारतीय सेनेमध्ये सेवा करून काही निवृत्त झाले आहेत. तर अनेकजण सेवा बजावत आहेत. अनेकांनी सेनेमध्ये मेजर कॅप्टन ही पदे भूषवलेली आहेत. कॅप्टन नारायण सांबरेकर यांनी सेनेत कॅप्टन म्हणून, येळ्ळूरमधील पहिले सेनाधिकारी कै. दत्तात्रय धोंडीबा पाटील यांनी मेजर व पुढे ऑनररी कॅप्टन तसेच डी. बी. पाटील (मेजर-सुभेदार) यांनीही ऑनररी कॅप्टन म्हणून सेवा बजावली. भारतीय नौसेनेमध्ये कै. नागेंद्र नांदुरकर, शिवाजी धुळजी, मनोहर घाडी आदींनी सेवा बजावत परदेश दौरेही केले आहेत. डी. ए. पाटील यांनी नौसेनेमध्ये सेवा बजावून निवृत्त झाल्यावर बेळगाव जिल्हा नियोजन सेवा खात्यात हॉस्टेल रेक्टर म्हणून कार्य केले. कै. शंकर देवाप्पा पाटील, कै. अनंत परशराम कुगजी, कै. शांताराम जाधव हे सेनेत वरिष्ठ अधिकारी होते.
राजकीय क्षेत्रात ही अनेक माजी विद्यार्थी उदयाला आले असून त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा चिटणीस व येळ्ळूर गावचे सलग 25 वर्ष चेअरमन राहिलेले कै. ना. जो. घाडी, माजी जिल्हा पंचायत सदस्य व येळ्ळूरचे कर्तबगार माजी ग्रामपंचायत चेअरमन कै. उमाजीराव तोपिनकट्टी. कै. रामचंद्र नागोजी पाटील (स्वातंत्र्यसैनिक), कै. बळवंत पाटील (स्वातंत्र्यसैनिक), कै. रामचंद्र बळवंत पाटील (पोलीस पाटील), कै. मल्हारी पाटील (पोलीस पाटील) यांनी दुसऱ्या महायुद्धात चांगली कामगिरी बजाविली. त्याचबरोबर माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, श्री. वाय. एन. मजुकर, जि. पं. सदस्य दत्ता लोहार, माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन गोरल, माजी तालुका पंचायत सदस्य श्री. रावजी पाटील, दामोदर परीट, त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, तसेच माजी ग्रा. पं. उपाध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी आदींनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही महत्त्वाची कामगिरी बजावली असून, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यात मोठा सहभाग दर्शविला आहे. कै. ना. जो. घाडी, कै. उमाजीराव तोपिनकट्टी, कै. बाळाराम कंग्राळकर, कै. आप्पाजी सायनेकर, कै. शंकर कदम व माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी सीमा चळवळीमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. या गावचा ऐतिहासिक साराबंदी लढा सर्वश्रुत असून या लढ्यात अनेक माजी विद्यार्थी त्यांच्यासह सहभागी होते. दौलतअण्णा कुगजी, कै. हणमंत कर्लेकर, कै. शटटू रेमाणी कुगजी, कै. धाकोजी घाडी, कै. मऱ्याप्पा पाटील, दत्ता उघाडे (म.ए. समिती युवा आघाडी नेते), किरण पाटील (काँग्रेस), येळ्ळूर म. ए. समिती अध्यक्ष शांताराम कुगजी यांनी लाकूड वखार सांभाळत समितीचे कार्य चालविले आहे. खानापूर तालुक्याचे माजी आमदार व गर्लगुंजीचे सुपुत्र कै. वसंतराव पाटील हेही या शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आमदार या नात्याने व सीमा चळवळीमध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. कै. गिरगौडा पाटील हे कुरुंदवाड संस्थानात दस्तलेखक (बॉडरायटर) होते. त्यानंतर कै. महादेव पाटील दस्तलेखन करायचे. त्यानंतरच्या काळात त्यांचे चिरंजीव सी. एम. पाटील व बी. एम. पाटील हे नावाजलेले दस्तलेखक आहेत.
पत्रकारितेमध्येसुद्धा अनेक जणांनी आपले कर्तृत्व दाखवले आहे. त्यामध्ये कै. कृष्णा मुचंडी (संस्थापक व संपादक- दैनिक वार्ता), श्री. वाय. एन. मजुकर दैनिक पुढारी व तरुण भारत या ठिकाणी कार्य केलेले आहे. गंगाधर पाटील हे दैनिक पुढारीमध्ये सध्या कार्यरत आहेत.
क्रीडा क्षेत्रामध्ये या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. गावची कुस्ती क्षेत्रामध्ये वैभवशाली परंपरा आहे. प्रसिद्ध मल्ल कै. रामचंद्र अनगोळकर, कै. परशराम कुगजी, कै. जयराम घाडी, कै. मुकुंद खणगावकर, कै. भरमानी गोरल, शट्टूपा घाडी, कै. गोपाळ अनगोळकर, यल्लाप्पा पोटे (भारतीय सेना, ऑलिंपिक वीर), यांची परंपरा अनेकांनी चालवली असून त्यामध्ये एम. सी. हट्टीकर (युनिव्हर्सिटी ब्लू), मारुती अनगोळकर (भारतीय सेना), मारुती (चिवटू) घाडी (भारतीय सेना), यल्लाप्पा अनगोळकर आदींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
कबड्डी व खो-खो खेळामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर सुवर्णपदके मिळवून उत्तम कामगिरी केली आहे. रेणुका खणगावकर हिने तर कर्नाटक राज्याच्या खो-खो संघाचे कप्तानपद भूषविले आहे. श्री चांगळेश्वरी हायस्कुल व मॉडेल स्कुलच्या माजी विद्यार्थिनींचा प्रामुख्याने सहभाग असलेला हा संघ 1982 सालच्या राष्ट्रीय सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. या राष्ट्रीय पातळीवरील विजयी संघाचा कर्नाटक राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आर. गुंडूराव यांनी यथोचित सन्मान केला होता. क्रीडा क्षेत्रात निवृत जिल्हा क्रीडा अधिकारी व कुस्तीकोच विलास घाडी, कुस्तीकोच श्री. के. एम. पाटील (किणये), कुस्तीकोच मारुती घाडी यांनी क्रीडाक्षेत्रात भरीव योगदान दिले. कै. मारुती कुगजी व सहकाऱ्यांनी महाराष्ट्र कुस्ती मैदान, येळ्ळूरच्यावतीने दरवर्षी राष्ट्रीय कुस्ती मैदान भरवण्याचे कार्य चालविले आहे. खो-खो व कबड्डी कोच मधु पाटील यांनी NIS येथे राष्ट्रीय पंच म्हणून क्रीडा क्षेत्रात कर्तृत्व बजावले आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरचे सुवर्णपदक विजेते खेळाडू तयार केले आहेत.
सहकार क्षेत्रामध्ये नवहिंद क्रीडा केंद्राचे संस्थापक कै. वाय. बी. चौगुले व त्यांचे सहकारी कै. एल. आय. पाटील, प्रदीप मुरकुटे, उदय जाधव यांनी विविध ठिकाणी सहकारी सोसायट्यांची स्थापना करून या भागातील सहकार क्षेत्र समृद्ध केले आहे. आज सहकार क्षेत्रातील अव्वल दर्जाची सोसायटी म्हणून नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावारूपाला आली आहे. दौलतअण्णा कुगजी, प्रदीप देसाई व सहकारी यांनी शेतकरी सहकारी संघाची स्थापना करून कार्य चालविले आहे. प्रल्हाद गिरगौडा पाटील व सहकाऱ्यांनी कृषी पत्तीन सोसायटी व राजहंसगड को-ऑप सोसायटी उत्तमरीतीने चालविल्या आहेत. किणये येथील कै. तानाजी डुकरे यांनी ज्ञानेश्वर सोसायटी, गजानन उघाडे व सहकाऱ्यांनी सन्मित्र सोसायटीची स्थापना केली आहे. बाबुराव मुरकुटे, परशराम घाडी, कै. मनोहर हावळ, कै. अनंत पाटील आदी माजी सैनिकांनी सैनिक सोसायटीची स्थापना करून सहकार क्षेत्र समृद्ध केले. डी. जी. पाटील, भरत मुरकुटे आर्दीनी आपल्या सहकाऱ्यांसह नेताजी सोसायटीची, तर अविनाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वामी विवेकानंद सहकारी सोसायटीची स्थापना केली आहे. तसेच मी स्वतः संस्थेतील शिक्षकांच्या सहकार्याने श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ कर्मचारी सहकारी संघाची स्थापना करून कार्य चालविले आहे.
औद्योगिक क्षेत्रांमध्येही शाळेचे माजी विद्यार्थी आघाडीवर आहेत. कै. मारुती कणबरकर यांनी लेथ मशीन तसेच चांगाप्पा लोहार यांनी लेथ मशीनसह फॅब्रिकेशन व्यवसाय चालविला आहे. त्याचबरोबर कै. भालचंद्र चौगुले सिमेंट-विट निर्मिती व्यवसाय तसेच विनायक पाटील यांनीही पेवर्स निर्मिती व्यवसायात प्रगती साधली आहे. प्रमोद देसाई, मारुती घाडी, आदिनाथ धामणेकर, रोहन पाटील व रुशेसेन पाटील यांनी हॉटेल व्यवसाय उत्तम असे चालविला आहेत. स्टील व लाकडी फर्निचर निर्मिती व्यवसायाबरोबर विविध औद्योगिक व्यवसाय अनेक माजी विद्यार्थी करत आहेत.
बेळगाव परिसरात कै. आर. के. पाटील, कै. एम. के. पाटील, कै. भरमाणी हलगेकर. कै. अमरनाथ बुवा, महादेव काकतकर, यल्लाप्पा पावले, चंद्रकांतदादा पाटील, शंकर मुचंडी त्याचबरोबर प्रमोद पाटील यांनी बांधकाम व्यवसायात नावलौकिक मिळविला आहे. अजित गोरल, नागेश कुगजी, संजय बेळगावकर आदींनी सिमेंट बांधकाम उपयुक्त साहित्य विक्री व्यवसायात नावलौकिक केला आहे.
वैद्यकीय व्यवसायातही या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी दर्शविली असून, बेळगावचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. प्रकाश बाबलीचे, डॉ. एन. बी. पाटील, डॉ. पी. टी मुचंडी, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. विवेक मेणसे, डॉ. सुधीर पाटील आदींनी जनतेची वैद्यकीय सेवा उत्तमरीतीने चालविली आहे. या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी शिक्षक व प्राध्यापक म्हणून कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रात सेवा बजावत आहेत.
प्रल्हाद सुतार हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महान चित्रकार होते त्यांनी बऱ्याच चित्रपटांसाठी पोस्टर्स तयार करून दिली आहेत. जयपाल पुजारी हे सुद्धा नावाजलेले चित्रकार होते. शेडेगाळी तालुका खानापूरचे सुपुत्र व कर्नाटक यूनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट बंडू देसाई हे या शाळेचे माजी विद्यार्थी. यांनी हैदराबाद, कोलार, मलाजखंड (मध्य प्रदेश) येथे सीनियरची जिऑलॉजिस्ट म्हणून व नागपूर येथे तांब्याच्या खाणीमध्ये सीनियर चीफ जिऑलॉजिस्ट म्हणून काम केले असून विश्वनाथ पाटील यांनी भूगर्भ खात्यामध्ये चीफ जिऑलॉजिस्ट या नात्याने महाराष्ट्रामध्ये कामगिरी बजावली आहे. चांगदेव कोणेरी पाटील यांनीही पुणे येथे जिऑलॉजिस्ट म्हणून कार्य केले. वासुदेव हुवाप्पा जाधव यांनी कोल्हापूर जिल्हा वनाधिकारी (DFO), कै. मनोहर हुवाप्पा बिर्जे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे विभागीय वनाधिकारी (रेंजर) म्हणून कार्य केले.
येळ्ळूर गावच्या शेजारील सुळगे (ये.) अवचारहट्टी, मासगोंडहट्टी, देवगणहट्टी, धामणे आदी भागातील जुन्या पिढीतील मंडळींनी या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले आहे. सुळगे गावचे सुपुत्र कै. मल्हारराव कुकडोळकर हे मुंबईला डीआयजी पदावर होते. कै. नारायण कुकडोळकर हेही मुंबईला पीएसआय होते. कै. आप्पाजी पाटील, कै. सिताराम कुकडोळकर हे ग्रामलेखापाल होते. सन १९५०च्या दरम्यान भुजंग पाटील हे मुंबई रेल्वेत वरिष्ठ अधिकारी होते. रामचंद्र नंदद्याळकर हे मुंबईस्थित कंपनीत जनरल मॅनेजर होते. दिलीप पाटील व भावकाण्णा कामती युनिअन बँकेत वरिष्ठ अधिकारी, श्री. परशराम कामती (निवृत्त प्राचार्य टेक्निकल कॉलेज पारगाव, कोल्हापूर), ए. डी. पाटील हे कोल्हापूर येथे सहायक वनाधिकारी होते. निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील सर, शिवराज हायस्कूल गडहिंग्लजचे पी. वाय. पाटील त्याचबरोबर पाटील नर्सिंग होमचे डॉ. संपत पाटील हेही याच शाळेचे विद्यार्थी. मासगोंडहट्टीयेथील कै. एल. एस. मेलगे (आदर्श शिक्षक गोवा), कै. तानाजी हेळवी (आदर्श शिक्षक बेळगाव), देवगणहट्टीचे वाय. एस. बसरीकट्टी यांनी महसूल खात्यामध्ये सेवा बजाविली.
अशा तन्हेने या शाळेने अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी तयार केले असून एकप्रकारे महान समाजसेवा घडविलेली आहे. सध्या शाळेचे मुख्याध्यापक या नात्याने श्री. राजेंद्रकुमार चलवादी हे सेवा बजावत असून शाळेची पहिली ते सातवीपर्यंतची पटसंख्या 415 आहे. तर नव्याने जोडलेल्या एलकेजी ची संख्या तीस आहे. शाळेमध्ये सध्या 15 शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. यामुळेच या शाळेच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य आहे. या शाळेचा होऊ घातलेला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव या शाळेच्या किर्तीत फार मोठा भर घालणार असून, सर्वत्र शाळांच्या समोर एक चांगला आदर्श निर्माण करणार आहे. सध्या या भागातील एक दर्जेदार शाळा म्हणून शाळेचा लौकिक असून, विद्यमान मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षिका उत्तम सेवा बजावत आहेत. या शाळेचा दर्जा कायम राहून शाळेचा उत्तरोत्तर सर्वांगीण विकास होवो. हीच सदिच्छा.
– श्री. वाय. एन. मजूकर, संस्थापक श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, येळ्ळूर, माजी विद्यार्थी 1950-57