
निपाणी (वार्ता) : आठवड्याभरापासून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे येथे गुरुवारी भरत असलेल्या आठवडी बाजारावर वाढत्या उन्हाचा परिणाम जाणवला. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवत असल्याने बाजारातील नेहमीची गर्दी यावेळी दिसली नाही.
निपाणी परिसरात सुमारे ३० ते ४० खेडी आहेत. येथील बहुतांशी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांचा व्यवहार या बाजारावर अवलंबून आहे. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी येथे मोठी गर्दी असते. मात्र गुरुवारी तापमानाचा पारा तब्बल ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळल्याचे दिसून आले. बहुतांश ग्रामस्थांनी सकाळी सात ते अकरा या वेळेतच भाजीपाला खरेदी करण्यास प्राधान्य दिले. तर संध्याकाळी चारनंतर ऊन कमी झाल्यावर पुन्हा काही प्रमाणात वर्दळ दिसली. साधारणपणे आठवडी बाजाराच्या दिवशी रस्त्यावर मोठी गर्दी होते. मात्र आज उन्हाच्या तीव्रतेमुळे बाजारपेठ नेहमीच्या तुलनेने ओस पडलेली दिसली. वाढत्या उन्हामुळे भाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारात भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाल्याचे ग्राहकांनी सांगितलले.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शहर आणि ग्रामीण भागात थंड पाण्यासाठी माठांना मागणी वाढली आहे. गोरगरिबांचा ‘फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांची खरेदी बाजारात होताना दिसली.
Belgaum Varta Belgaum Varta