बेळगाव : क्षयरोगाच्या नियंत्रणात बेळगाव जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक मिळविले असून बेळगाव जिल्ह्याला मिळालेल्या यशाबद्दल जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी आनंद व्यक्त केला आहे. शिवाय पुढील वर्षी सुवर्णपदकाचा दिशेने कार्यरत राहण्यासाठी आवाहन केले आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि संघ, क्षयरोग नियंत्रण विभाग, माहिती आणि जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केलेली केएलई संस्थेच्या जेएनएमसी कॅम्पसमधील डॉ. बी. एस. कोडकिनी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमात क्षयरोग निवारण्यासाठी प्रतिज्ञा देण्यात आली.
या कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, राज्यातील १०० टक्के लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये बेळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. क्षयरोग दिनानिमित्त बेळगाव जिल्ह्याला मिळालेले यश हे कौतुकास्पद असून आगामी काळात सुवर्णपदक मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन त्यांनी केले. क्षयरोग निवारण्यासाठी आपण साऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यानंतर आमदार अनिल बेनके बोलताना म्हणाले, गेल्या २० ते ३० वर्षांपूर्वी टीबी हा रोग गंभीर होता. कोरोनाहून अधिक भयानक असा हा रोग असून या रोगाच्या नियंत्रणात बेळगावच्या रौप्य पदक मिळविले हि अभिमानास्पद बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात क्षयरोग निवारण्यासाठी परिश्रम घेत असलेल्या तज्ज्ञ आणि वैद्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी डीएचओ डॉ. शशिधर मुन्याळ, डॉ. तुक्कार, डॉ. सुधाकर, डॉ. मुबाशीरा, टीएचओ डॉ. शिवानंद मास्तिहोळी आदींसह अनेक वैद्य, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.