
कावळे, चिमण्यांसाठी धान्य, पाण्याची सोय
निपाणी (वार्ता) : बदलती जीवनशैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, मोबाईल टॉवर रेंजमुळे कावळे, चिमण्यांसह इतर पक्ष्यांवर परिणाम झाला आहे. त्यांच्या प्रजाती जतन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. चैत्रात नवी पालवी आल्याने शाळेच्या आवारातील झाडांवर पक्षी दिसून येत आहेत. उन्हाळ्यात पक्ष्यांची भटकंती सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील कोडणी रस्त्यावरील अंकुरम इंलिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाटील, डॉ. ज्योतिबा चौगुले, सचिव अमर चौगुले, प्राचार्या चेतना चौगुले यांच्या नेतृत्वाखाली परिसरात झाडांना विद्यार्थ्यांनी पाणपोई आणि धान्य खाण्याचे साहित्य बांधले आहे. त्यामध्ये पाण्यासह धान्यही ठेवल्याने पक्षांची सोय झाली आहे.
वाढत्या उन्हामुळे जनावरासह पशु-पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अवैध वृक्षतोड, वाढणारी सिमेंटच्या जंगल्यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत चालला आहे. त्यामुळे ४ वर्षांपासून शाळेच्या परिसरात जेथे जागा मिळेल तेथे विविध झाडांचे वृक्षारोपण केल्यामुळे विविध पक्ष्यांची संख्या वाढली आहे. चिमुकल्यांनी शाळेसह आपल्या घरांच्या
परसातील झाडांवर छोट्या-छोट्या माती व प्लास्टिकच्या बाटल्या, द्रोणांमध्ये पाण्याची खास सोय केली आहे.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. ज्योतिबा चौगुले, डॉ. उत्तम पाटील, सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले, प्राचार्या चेतना चौगुले, अर्पिता कुलकर्णी, ओसिया शहा, सौरभ कांबळे, शिल्पा तारळे, माधुरी लोळसुरे, दीप्ती कांबळे, मोहन कोरव, सम्राट निंबाळकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
—
Belgaum Varta Belgaum Varta