
आमदार शशिकला जोल्ले: महिला सक्षमीकरणाला चालना
बेळगाव : केंद्र सरकारने लागू केलेला ‘नारी शक्ती वंदन’ कायदा हा देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, असे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. या कायद्यामुळे महिलांना राजकीय क्षेत्रात ३३ टक्के आरक्षण मिळणार असून, महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
बेळगाव येथे सोमवार (ता. १३) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या राजकीय सहभागाला बळ देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वर्ष २०२८ पर्यंत या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर बेळगाव जिल्ह्यातूनच सुमारे सहा महिला आमदार विधानसभेत प्रवेश करतील.’
महिलांना ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत संधी मिळाल्यासच ‘विकसित भारत’ ही संकल्पना पूर्णत्वास जाईल, असे सांगताना जोल्ले यांनी या कायद्यामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे नमूद केले. स्थानिक प्रश्न थेट संसदेत मांडण्याची संधीही महिलांना उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या ‘सुकन्या समृद्धी योजना’ आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारख्या उपक्रमांमुळे महिलांच्या विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. काही विरोध असूनही महिलांच्या हितासाठी हा कायदा लागू करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिलांवरील अत्याचारांविरोधात संसदेत ठामपणे आवाज उठवण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरेल, असेही त्या म्हणाल्या. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पनेलाही या निर्णयामुळे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप शहराध्यक्षा गीता सुतार, कर्नाटक राज्य महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत, उज्ज्वला बडवण्णाचे, शिल्पा केकरे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta