Friday , December 12 2025
Breaking News

मताला सहा हजार रुपयाचे अमिष; आमदार, मुख्यमंत्री, भाजप राष्ट्रीय अध्यक्षाविरुध्द कॉंग्रेसची तक्रार

Spread the love

 

बंगळूर, ता. २५: राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने मतदारांना आमिष दाखविल्याबद्दल काँग्रेस पक्षाने आमदार रमेश जारकीहोळी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी तक्रार पत्रावर स्वाक्षरी केली असून त्यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून तपास करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.
गोकाकच्या भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांनी नुकतेच विधानसभा निवडणुकीत प्रति मत सहा हजार रुपये देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. आक्षेपार्ह सीडी प्रकरणात अडकलेल्या जारकीहोळी यांनी २०२१ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
बेळगावात नुकत्याच झालेल्या रॅलीत सहभागी झालेले जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेसच्या विद्यमान आमदाराने तीन हजार रुपयांच्या भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली तर मी मतदारांना सहा हजार रुपयांच्या भेटवस्तू देईन.
जारकीहोळी यांच्या वक्तव्यापासून भाजपने अंतर ठेवले आहे, मात्र काँग्रेसने जारकीहोळी यांच्यासह भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
२२ जानेवारी २०२३ रोजी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री, भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी बेळगावमध्ये भाषण केले आणि पुढील कर्नाटक निवडणुकीत भाजप प्रति मत सहा हजार रुपये देणार असल्याचे सांगितले. हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत काँग्रेसने म्हटले आहे की, हे विधान कॅमेऱ्यात कैद झाले असून हे भाजप नेत्यांनी रचलेले षडयंत्र आहे आणि त्यात मुख्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांचाही सहभाग होता.
या विधानामागे भाजप हायकमांडच्या नेत्यांचा हात असून मतदारांना भ्रष्ट करण्याची ही संघटित योजना असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने भाजपवर लोकशाहीचे अपहरण केल्याचा आरोप केला आणि १८६० आयसीसीच्या कलम १७१ बी, १०७, १२० बी, ५०६ अंतर्गत चौकशीची मागणी केली. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम १२३ (१) अंतर्गत मतदारांना लाच देण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यात म्हटले आहे.
पाच कोटी मतदार असलेल्या राज्यात भाजपचे नेते ३० हजार कोटी रुपये खर्च करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *