
बेळगाव : श्रीदत्त पद्मनाभ पीठाचे विद्यमान पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित परमपूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी उचगाव (बेळगाव) येथे सामूहिक ‘दिव्य उपनयन संस्कार’ सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. हा सोहळा श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी-गोवा तसेच स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आला होता.
या सोहळ्यात 14 बालकांचा उपनयन संस्कार सुसंपन्न झाला. चौलकर्म, स्नान व शुद्धी, यज्ञोपवीत धारण, उपनयन मंगलाष्टक,गायत्री मंत्र उपदेश तसेच भिक्षाटन, मातृभोजन अशा प्रमुख विधीद्वारे हा संस्कार पूर्ण करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलत असताना वेदमूर्ती अनुपजी शेलार यांनी सनातन धर्मातील सोळा संस्कारांपैकी उपनयन हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. उपनयन याचा अर्थ ‘ज्ञानाच्या मार्गावर नेणे’ याच संस्कारातून बालकाच्या जीवनातील द्विजत्वाची (दुसरा जन्म) सुरुवात होते. गायत्री मंत्राच्या उपासनेद्वारे बुद्धीची प्रगल्भता वाढते, तर संध्यावंदन, जप-तप यांच्या आचरणामुळे शिस्त, संयम आणि सदाचाराचे संस्कार बळकट होतात. आधुनिक तंत्रज्ञानप्रधान युगातही या संस्काराचे महत्त्व अधोरेखित करत, कर्तव्यनिष्ठ व संस्कारित पिढी घडविण्याचा उद्देश व्यक्त केला.
श्रीदत्त पद्मनाभ पीठाच्या वतीने बेळगाव जिल्ह्यात उचगाव येथे हा पाचवा “सामूहिक दिव्य उपनयन संस्कार सोहळा” सुसंपन्न होत असून श्री दत्त पद्मनाभ पीठ देव,देश आणि धर्म कार्यामध्ये सदैव अग्रेसर राहून हिंदू धर्म संस्कारांचे रक्षण करत आहे आणि हे कार्य करत असताना पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींजी महाराजांचे विशेष मार्गदर्शन प्रामुख्याने मिळते असे प्रतिपादन संत समाज संघटनेचे उपाध्यक्ष श्री. रामचंद्रजी नाईक यांनी व्यक्त केले.
बेळगाव सारख्या ठिकाणी हा दिव्य उपनयन सोहळा संस्कार म्हणजे अत्यंत आनंदाची गोष्ट असून पूर्वीच्या काळी रामायण, महाभारतामध्ये जसे ऋषी यज्ञ करत होते जणूकाही तसेच हे दृश्य आज उचगाव येथे मळेकरणी देवीच्या प्रांगणात श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या पुढाकाराने आज आम्ही सर्वांनी पाहिले आणि प्रत्येक हिंदू बांधवांनी आपल्या बालकांवरती असे संस्कार करावे असे मनोगत बेळगाव ग्रामीणचे माजी भाजप अध्यक्ष श्री. धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला श्री. धनंजय जाधव (माजी भाजपा ग्रामीण अध्यक्ष), डॉ. प्रवीण देसाई (मंदिर पदाधिकारी), श्री. एल. डी. चौगुले (पत्रकार, सकाळ बेळगाव), श्री. भरत बाबू करन्नावर (उद्योजक बेळगाव), श्री. उमाशंकर देसाई (मंदिर पदाधिकारी) तसेच संत समाज संघटनेचे अध्यक्ष श्री. सुजन नाईक, उपाध्यक्ष रामचंद्र नाईक, सचिव रघुवीर शिरोडकर व सदस्य दर्शन नार्वेकर, तालुकाप्रमुख श्री. सोपान जी पाटील आणि श्री. निवृत्ती पाटील, संत समाज कुपटगिरी (खानापूर), संत समाज रामगरवाडी- ईदलहोंड यांचे सर्व पदाधिकारी, भाविक तसेच हिंदू धर्माभिमानी असंख्य संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरेश भालकेकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी बटुंना आशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta