कोल्हापूर : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना कोल्हापूर पोलिसांनी अडवून करून स्थानबद्ध केल्याची घटना आज घडली. या प्रकारामुळे सीमाभागातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत आपली भूमिका आणि मागण्या केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ कोल्हापूर येथे गेले होते.
गृहमंत्री अमित शहा हे महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
यावेळी समितीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता महाराष्ट्र पोलिस प्रशासनाने रोखले. तसेच काही नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
गेल्या सुमारे सात दशकांपासून सीमाभागातील मराठी भाषिक नागरिक न्याय हक्कांसाठी लढा देत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या व्यथा आणि मागण्या देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत असताना प्रशासनाने दडपशाहीचा मार्ग अवलंबल्याचा आरोप समितीच्या नेत्यांनी केला.
या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध व्यक्त केला असून, सीमाप्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालून सीमावासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta