बेळगाव : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत कत्तलखाने तात्काळ बंद करण्यात यावेत तसेच गो-हत्त्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्रीराम सेना बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष रविकुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना कोकितकर यांनी सांगितले की, 28 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद निमित्त कुर्बानी दिली जाते. त्यावेळी बकऱ्यांसह गाईंचीही अवैधरित्या कत्तल होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कर्नाटकात गो-हत्त्या बंदीचा कायदा अस्तित्वात असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. गाईंची तस्करी आणि अवैध हत्या रोखण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करावी, संशयास्पद वाहनांची तपासणी करावी आणि रात्रंदिवस पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
याशिवाय शहरातील अनधिकृत कसाईखाने तात्काळ बंद करण्यात यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गो-हत्त्या रोखण्यासाठी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे सांगत, प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही कोकितकर यांनी दिला.
यावेळी श्रीराम सेना उत्तर कर्नाटक उपाध्यक्ष विनय अंग्रोळी यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta