

बेळगाव : शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी मंत्री रामदास कदम आणि प्रसिद्ध व्याख्याते तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते नितीन बानगुडे पाटील यांनी शुक्रवारी खानापूर न्यायालयात प्रत्यक्ष हजेरी लावली.
२६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित युवा महामेळाव्यात दोन्ही नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप आहे. बेळगाव येथे होत असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या सभेनंतर जमावाने पोलिसांवर हल्ला करून सरकारी वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर खानापूर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ आणि १५३(अ) अंतर्गत दोन्ही नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या दीर्घकालीन प्रकरणाच्या सुनावणीत शुक्रवारी दोन्ही आरोपींचे जबाब न्यायालयाने नोंदवून घेतले. यापूर्वी दीर्घकाळ न्यायालयात हजर न राहिल्याने रामदास कदम यांच्या महाराष्ट्रातील खेड येथील मालमत्तेवर जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी न्यायालयात हजेरी लावून जामीन मिळवला होता.
या प्रकरणातील पुढील सुनावणी २३ जुलै २०२६ रोजी होणार असून, त्या दिवशी दोन्ही पक्षांकडून अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. या खटल्यात अॅड. शामसुंदर पत्तार आणि अॅड. हेमराज बेंचनावर हे सरकार पक्षाचे कामकाज पाहत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta