

येळ्ळूर : येथील समाज सारथी सेवा संघटनेच्या वतीने रविवारी (दि. १२) रोजी नेताजी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. संघटनेचे अध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी संघटनेचे सदस्य अनिल हुंदरे यांनी वृक्षारोपणामागील उद्देश स्पष्ट करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. प्रकाश आष्टेकर यांनी परिसर स्वच्छ, सुंदर व हिरवागार ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे सांगितले. अभियंते हणमंत कुगजी यांनी, निसर्ग हाच जीवनाचा खरा आधार असून वृक्षारोपण म्हणजे निसर्गाची जोपासना असल्याचे प्रतिपादन केले. मनुष्य, प्राणी आणि पक्षी यांचे अस्तित्व निसर्गावर अवलंबून असल्याने पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले. निवृत्त शिक्षक गोविंद काळसेकर यांनीही पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी शिवाजी सायनेकर, दुद्दाप्पा बागेवाडी, सतीश पाटील, यल्लुप्पा पाटील, डॉ. तानाजी पावले, बळीराम देसुरकर, हणमंत पाटील, प्रकाश पाटील, सुभाष मजुकर, सुरज गोरल, कृष्णा टक्केकर, कृष्णा बिजगरकर, गंगाधर पाटील यांच्यासह समाज सारथी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंबा, काजू , बदाम, चाफा, व निलगिरी आदी रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

Belgaum Varta Belgaum Varta