

बेळगाव : पावसाच्या कमतरतेमुळे राज्यातील काही भागांत पिकांचे नुकसान झाल्याची माहिती असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामा व पाहणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत व आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
चिक्कोडी येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील इतर भागांच्या तुलनेत चिक्कोडी परिसरात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मात्र, सध्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही गंभीर समस्या निर्माण झालेली नाही. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करतील. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि अन्य आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत विचारले असता, जिल्ह्यांची पुनर्रचना आणि प्रशासकीय बदलांबाबत सरकार स्तरावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. चिक्कोडी जिल्ह्याचा प्रस्तावही विचाराधीन असून, योग्य वेळी सरकार याबाबत निर्णय जाहीर करेल, असे त्यांनी नमूद केले.
बेळगावमध्ये होणाऱ्या आरएसएसच्या बैठकीबाबत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. “या विषयाची मला माहिती नाही. पुढे काय घडते, ते पाहावे लागेल,” असे ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायिका एस. जानकी यांच्या निधनाबद्दलही त्यांनी शोक व्यक्त केला. “एस. जानकी या श्रेष्ठ गायिका होत्या. त्यांच्या निधनामुळे कर्नाटकासह संपूर्ण संगीतविश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Belgaum Varta Belgaum Varta