

बेळगाव : परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कोळपणी व भांगलणीच्या कामांना वेग दिला आहे. भातासह विविध पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली ही कामे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असून शेतांमध्ये पुन्हा एकदा लगबगीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरीप हंगामाच्या प्रारंभी शेतकरी मशागत, शेणखताचा वापर आणि पेरणीची तयारी करतात. काही शेतकरी रोहिणी नक्षत्रात धुळीची पेरणी करतात, तर काही जण पावसाची पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करण्याला प्राधान्य देतात. धुळीच्या पेरणीनंतर पाऊस लांबल्यास किंवा खंड पडल्यास बियाणे खराब होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे काही वेळा दुबार पेरणी किंवा लावणीचा खर्चही शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.
अनुभवी शेतकरी योग्य वेळ साधून मशागत, कोळपणी आणि भांगलणीची कामे करत असल्याने पिकांची वाढ चांगली होते, असे कृषी जाणकार सांगतात. आधुनिक शेती अवजारे उपलब्ध असली तरी अनेक ग्रामीण भागांत बैलांच्या साहाय्याने कोळपणी आणि महिलांकडून पारंपरिक पद्धतीने भांगलणी करण्याची परंपरा आजही कायम आहे. तण नियंत्रणासह पिकांच्या वाढीसाठी भांगलणी महत्त्वाची मानली जाते.
सध्या हवामान अनुकूल झाल्याने शेतकरी आणि महिला मजूर शेतात मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून, पावसाची उसंत मिळाल्याचा फायदा घेत खरीप हंगामातील महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta