

कुद्रेमानी (प्रतिनिधी) : कुद्रेमानी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सन २०२८ मध्ये भरविण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत हनुमान मंदिर येथे एकमताने घेण्यात आला. या निर्णयामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यात्रेच्या नियोजनाला सुरूवात झाली आहे.
ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महालक्ष्मी मंदिराचे अलीकडील काळात नव्याने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विविध कारणांमुळे यात्रा भरविणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आता सर्व ग्रामस्थांनी एकमताने सन २०२८ मध्ये महालक्ष्मी यात्रा भरविण्याचा शिक्कामोर्तब निर्णय घेतला.
पहिल्याच बैठकीत यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सुमारे दीड वर्षांचा कालावधी उपलब्ध असल्याने गावकऱ्यांना नियोजनबद्ध तयारी करण्याची संधी मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यात्रेच्या पूर्वतयारीसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पुन्हा ग्रामसभा घेऊन पुढील नियोजन निश्चित करण्यात येणार असून, त्याच बैठकीत महालक्ष्मी यात्रा समितीची स्थापना करून विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी रवी पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना यात्रा ही गावाच्या एकोप्याचे, परंपरेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असल्याचे सांगत सर्वांनी एकदिलाने सहभाग घेण्याचे आवाहन केले.
बैठकीस दीपक पाटील, विनायक नारायण पाटील, सुरेश पाटील, शिवाजी गुरव, धोडिंबा पाटील, नाना मारुती पाटील, शांताराम पाटील, मल्लाप्पा निंगाप्पा पाटील, अरुण देवण, बाळाराम कदम, संजय राजगोळकर, प्रकाश गावडू गुरव, पिंटू कागणकर, शंकर पाटील, वैजू कागणकर, रामलिंग पाटील, रवळू देवण, मधु पन्हाळकर, सुरेश केदारी पाटील, रोहन पाटील, शटुप्पा राजगोळकर, मधु पन्हाळकर, लक्ष्मण राजगोळकर, वैजू मराठे, प्रकाश बिजगर्णीकर, आप्पाजी नाईक, वैजू नाईक, गोविंद कांबळे, मऱ्याप्पा कांबळे, परशू कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी बाळाराम रामचंद्र धामणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सन २०२८ मधील महालक्ष्मी यात्रेच्या निर्णयामुळे कुद्रेमानी गावात नवचैतन्य निर्माण झाले असून, गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नव्या उत्साहाने उजाळा मिळणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta