

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुधोळगी (मुडलगी) तालुक्यातील नागनूर गावाच्या हद्दीत ऊसाच्या शेतात काम करत असताना तुटलेल्या वीजतारेचा स्पर्श झाल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
मृतांची ओळख मुत्तप्पा श्रीशैल मुगळखोड (वय 46) आणि राजेश्वरी मुगळखोड (वय 36) अशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दाम्पत्य ऊसाच्या शेतात तण काढण्याचे काम करत असताना अचानक वीजवाहिनीची तार तुटून खाली पडली. या तारेचा स्पर्श झाल्याने दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप केला. धोकादायक स्थितीत लोंबकळणाऱ्या वीजतारांची योग्य देखभाल करण्यात आली नसल्याने दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याचा आरोप त्यांनी केला.
घटनेची माहिती मिळताच मुधोळगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपास सुरू असून, या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta