


बेळगाव : प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केपीसीसीच्या कित्तूर कर्नाटक प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले.
बेळगाव येथील जिल्हा काँग्रेस समिती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७० टक्के नोंदणीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक ६ भरून नोंदणी करावी. स्थानिक स्तरावर अधिकारी उपलब्ध नसल्यास तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी मतदार नोंदणी आवश्यक असल्याचे सांगताना डॉ. निंबाळकर यांनी केंद्र सरकारच्या काही धोरणांवर टीका केली. तसेच राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी मतदार यादी अद्ययावत असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी या नोंदणी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, विविध ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Belgaum Varta Belgaum Varta