
बेळगाव : मित्रांसोबत कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पोहता न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील आजूर गावाबाहेरील कालव्यात घडली.
मृत तरुणाचे नाव कुशीचेंद्र राममनोहर बडाह (वय २३) असे असून तो उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हत्तगाव गावचा रहिवासी होता. मजुरीच्या कामासाठी तो काही दिवसांपूर्वी आजूर परिसरात आला होता.
शुक्रवारी तो आपल्या मित्रांसह गावाबाहेरील कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्यात उतरल्यावर त्याला पोहता येत नसल्याने तो अचानक पाण्याच्या प्रवाहात अडकून बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम राबवून कालव्यातून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अथणी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अथणी पोलिसांकडून सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta