Sunday , August 16 2026
Breaking News

तिरंगा हा देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा प्रतीक : प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार

Spread the love

 

शिवानंद महाविद्यालयाच्या NCC विभागातर्फे ‘हर घर तिरंगा’ प्रभातफेरी उत्साहात

कागवाड : तिरंगा ध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय असून तो देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे. तिरंग्याचा सन्मान करणे ही प्रत्येक भारतीयाची राष्ट्रीय जबाबदारी आहे. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमामुळे नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ होते, राष्ट्रध्वजाबद्दल आदर निर्माण होतो आणि नव्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव होते. अशा उपक्रमांमधून राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाची भावना समाजात रुजण्यास मदत होते. प्रत्येक घरावर तिरंगा अभिमानाने फडकताना दिसणे हीच आपल्या राष्ट्रभक्तीची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन शिवानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवानंद महाविद्यालय, कागवाड येथील NCC विभागातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत प्रभातफेरी व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार यांनी तिरंगा ध्वज उंचावून प्रभातफेरीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
यावेळी NCC अधिकारी लेफ्टनंट अशोक आलगोंडी यांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. ‘हर घर तिरंगा’ हा केवळ घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचा उपक्रम नसून प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेची भावना निर्माण करणारे अभियान आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, त्याची प्रतिष्ठा व पावित्र्य जपावे आणि या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयातून सुरू झालेली प्रभातफेरी बसस्थानक, मुख्य रस्ता मार्गे गावाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर रॅली पुन्हा राणी चन्नम्मा चौकात आल्यानंतर NCC कॅडेट्सनी मनुष्यसाखळी तयार करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. हातात तिरंगा ध्वज घेऊन आणि देशभक्तीपर घोषणा देत कॅडेट्सनी परिसर दणाणून सोडला.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’, ‘हर घर तिरंगा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीदरम्यान NCC कॅडेट्सनी नागरिकांशी संवाद साधत ‘आपल्या घरावर सन्मानाने तिरंगा फडकवा’, ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ आणि ‘हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा’ असा संदेश दिला. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कॅडेट्सचे कौतुक केले.
या प्रभातफेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि देशभक्तीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. NCC कॅडेट्सनी शिस्तबद्ध संचलन, घोषणाबाजी आणि जनजागृतीच्या माध्यमातून अभियानाचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रभक्तिपर गीताचे सामूहिक गायन केले. यानंतर ‘हर घर तिरंगा’ प्रभातफेरीची सांगता करण्यात आली.
या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, सिनियर अंडर ऑफिसर सूरज न्हावी, ज्युनिअर अंडर ऑफिसर राजश्री काडापुरे, ज्युनिअर अंडर ऑफिसर अनिकेत कांबळे तसेच मोठ्या संख्येने NCC कॅडेट्स उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *