बेळगाव : सीमाप्रश्नी तज्ञ समितीची लवकरच बैठक बोलावण्यात येणार आहे. तसेच बैठकीनंतर सीमाप्रश्नी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता केली जाईल. सीमाप्रश्न लवकर सुटण्यासाठी पावले उचलू, अशी माहिती महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व सीमाप्रश्नी तज्ञ कमिटीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दावा दाव्याला गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवसात अधिकाऱ्यांशी चर्चा करून तज्ञ समितीची बैठक घेण्याबाबत सूचना करणार आहोत. सीमाप्रश्न लवकर सुटावा यासाठी तज्ञ समितीच्या बैठकीमध्ये मुद्दे समोर येतील त्याबाबत तातडीने पावले उचलली जातील अशी ग्वाही दिली आहे.
