बेळगाव : सीमाप्रश्न तज्ञ समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. राम महादेव आपटे (दादा) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी राणी चन्नमा नगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
१९२६ साली जन्मलेले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे अनुयायी बनून छोडो भारत चळवळीचे कार्यकर्ते बनलेले, पुढे सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढ्यात सक्रिय झालेले, कामगारांच्या पाठीशी कायद्याची ताकत उभी केलेले आणि वयाच्या ९०दी नंतर देखील त्याच तळमळीने काम करत राहणारे बेळगावचे हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते.
बेळगाव सीमा प्रश्नाच्या वकिलांच्या तज्ञ समितीत ते होते. मागील वर्षी त्यांनी मुंबईत झालेली बेळगाव सीमाप्रश्न तज्ञ समितीची बैठक या वयात देखील हजेरी लावली होती त्यामुळे त्यांचे त्यावेळी सीमा प्रश्नावरील तळमळ दिसून आली होती. सर्वोच्च न्यायालयात जो सीमाप्रश्नाचा खटला सुरू आहे त्याचा पाया राम आपटे सर आहेत. पहिला दावा त्यांनी दाखल केला तेंव्हा म. ए. समितीने त्यांना लागणारी रक्कम जमा करून दिली होती, पुढे तो खटला आणि एकंदर जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आणि आपटे यांचे पैसे परत केले, ते पैसे आपटे यांना गुपचूप ठेऊन घेता आलेही असते मात्र त्यांना ज्या नेते आणि कार्यकर्त्यांनी ते जमवून दिले होते त्यांच्याकडे सोपवून त्यांनी आपली पिढीजात प्रामाणिकतेची परंपरा जोपासली. आजही आपटे यांच्या सल्ल्यानेच सीमाप्रश्नाची खटल्याची कामे चालतात.
देहदान केल्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अंतीम दर्शनासाठी घरी पार्थिव ठेवण्यात येईल.
पत्ता – (समाधान बिल्डिंग, श्रीराम काॅलनी, 2 स्टेज, राणी चन्नमा नगर, बेळगांव) त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.