बेळगाव : 75 वर्षांनंतर ‘देश बचाओ, धर्म बचाओ, हिंदू समाज बचाओ’चा नारा द्यावा लागणार आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र या असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केले.
बेळगावातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात काल, रविवारी सायंकाळी श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विराट हिंदू मेळावा पार पडला.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजयभाई देसाई उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी गोळीबारात जखमी झालेले श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर थेट विराट हिंदू संमेलनाला हजेरी लावली. प्रमोद मुतालिक व अन्य मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या विराट संमेलनात प्रमोद मुतालिक यांनी काँग्रेस आणि हिंदूविरोधी शक्तींवर जोरदार हल्ला चढवला. या देशात तीन वाईट शक्ती कार्यरत आहेत. एक इस्लाम, दुसरा ख्रिश्चन, तिसरी साम्यवादी या तीन वाईट शक्ती आपली महान संस्कृती, धर्म आणि परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. नास्तिक, विचारवंत, हिंदूविरोधी शक्तींनी बरीच जमीन आणि पाणी गिळंकृत केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 96 वर्षे झाली आहेत, चार वर्षांनी शताब्दी साजरी होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीने आज आपल्याला इथपर्यंत पोहोचवले आहे. आरएसएस 96 वर्षांपासून हिंदू विचारधारा देत आहे. इस्लाम, ख्रिश्चन आणि कम्युनिझमला चिरडून हिंदू राष्ट्र उभारायचे आहे. त्यासाठी विराट हिंदू अधिवेशन घेण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
कधीकाळी कृष्णाचा जन्म झाला असे म्हणतात. नरेंद्र मोदी त्याचाच एक भाग आहेत. ‘ना खावूंगा ना खाने दूंगा’ असे ते म्हणतात. याला 9 वर्षांत एकही अपवाद नाही. जम्मू काश्मीरमध्ये आमच्या जवानांवर गद्दार मुस्लिम गुंडांनी दगडफेक केली. मनमोहन सिंग यांच्या हातात बंदूक होती, पण सोनिया गांधींनी आदेश दिला नाही. त्यामुळे हातात बंदूक असूनही त्यांना अपमान सहन करावा लागला असे ते म्हणाले.
ख्रिश्चन हिंदू, दलित, ब्राह्मण, लिंगायत, कुरुबांचे धर्मांतर करतात. कोलार जिल्ह्यात दीड लाख कुरुबा वंशीयांचे त्यांनी धर्मांतर केले. दावणगेरे जिल्ह्यात एक लाख लिंगायतांचे धर्मांतर झाले. बैलहोंगल येथे एक चर्च आहे, त्यावर वीरशैव लिंगायत चर्च असा बोर्ड आहे याची दखल घ्यावी लागेल. काँग्रेस ख्रिश्चनांना धर्मांतरापासून परावृत्त करू इच्छित नाही. आपला तो देव आणि येशू, अल्लाह आदी बाकीचे पापी आहेत असे हिंदूंनी असे म्हटले नाही. सर्व लोक सुखी व्हावेत हीच हिंदूंची भावना, प्रार्थना असते. हिंदू धर्म टिकण्यासाठी देशाला भाजपची गरज आहे असे प्रमोद मुतालिक यांनी ठासून सांगितले. विराट संमेलनात शेकडो हिंदू कार्यकर्ते सहभागी झाले होते.