Thursday , May 15 2025
Breaking News

जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्‍यांशी चांगले वागायला हवं : संभाजी यादव यांचे प्रतिपादन

Spread the love

बेळगाव : वेगवेगळे किस्से, विनोद आणि कविता सादर करीत राधानगरीच्या संभाजी यादव यांनी प्रचंड हशा आणि टाळ्या मिळवीत येळळूरमधील रसिक जनतेला आपल्या हास्य दरबारात रंगवून ठेवले.
साहित्य संमेलनातील दुसरे सत्र हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा सादर करताना संभाजी यादव यांनी जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्‍यांशी चांगलं बोलायला हवं, चांगले वागायला हवं हे करीत असतानाच जीवनातील आनंद टिपायला शिका कारण
हसण्यासाठी जन्म आपला
रडण्यासाठी नाही
दिस उद्याचा कोणी पाहिला
जगण्याचा काही नेम नाही
असे सांगत भाषेच्या विविध गमतीजमती, व्यसनमुक्ती, संगीतावर नाचणारी मुले आणि स्त्रिया, अंधश्रद्धा रूढी-परंपरा यांच्याकडून निर्माण होणारे विनोद सांगत यातून आनंद मिळवायला शिका असे सांगितले. मराठीतील अभिनेते दादा कोंडके, अशोक सराफ, श्रीराम लागू, निळू फुले, गणपत पाटील हे एकत्रित जात असताना काय गमती जमती होतात हे त्यांच्या आवाजात सांगितले. अमिताभ बच्चन अमीन सयानी व शरद पवार यांच्याही आवाजाची मिमिक्री त्यांनी सादर करून लोकांची वाहवा मिळविली. कन्नड व मराठी भाषा बोलणाऱ्याच्या संवादातून कशा गमती जमती होतात याचे प्रात्यक्षिक सादर केले.. तसेच अडाणी व सुशिक्षित लोकांच्या बोलण्यातून ही कसाविनोद निर्माण होतो याची उदाहरणे दिली.
ऑर्केस्ट्रामध्ये वाजविल्या जाणाऱ्या विविध वाद्यांचा आवाज त्यांनी आपल्या तोंडातून काढून दाखविला.. त्याच्या हुबेहूब पणामुळे लोकांनी त्यांचे कौतुक केले. मनोरंजनातून समाजप्रबोधन करण्याचं काम काही कलाकारांनी केलेला आहे त्यामुळे दादा कोंडके यांना नाक मुरडून चालणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले.
काही मंडळी घरातील वडीलधाऱ्यांना कुठेही फिरायला नेणे कमीपणाचे समजतात परंतु उघड्या अंगाच्या कुत्र्याला घेऊन जाताना कशा गमतीजमती घडतात हे सांगून त्यांनी लोकांना हसविले. वरात काढण्यामध्ये गावातील नवीन सुनेची ओळख सर्वांना व्हावी हाच असतो परंतु आता हे मागे पडून नव दाम्पत्याला कारमध्ये आत बसवून त्यांच्या गाडीसमोर नाचणाऱ्यानाच पाहण्याची वेळ लोकांच्यावर कशी आली आहे हे त्यांनी विनोदी पद्धतीने सादर केले..
गाडीच्या पाठीमागे लिहील्या जाणाऱ्या वाक्यांमुळे कसे विनोद निर्माण होतात किंवा चित्रपट पाहायला गेलेल्या नवरा-बायकोच्या मध्ये कसा संवाद घडतो, चुकीचे इंग्लिश बोलले तर अर्थाचा कसा अनर्थ होतो हे सांगून त्यांनी हशा टाळ्या मिळविल्या. कोणतीही गोष्ट फुकट मिळाली पाहिजे या हव्यासापोटी नारळाच्या झाडावर चढलेल्याची कशी पंचाईत होते हे त्यांनी विनोदी पद्धतीने सांगितले. असे विनोद घेऊनच आपण माणसात राहू या, आनंदात राहू या आणि मनाची मशागत करुन आनंदी जीवन जगू या असा उपदेशही त्यांनी केला..

About Belgaum Varta

Check Also

विनोद मेत्री व राजेश लोहार यांचे यश बेळगांवच्या खेळाडूंना प्रेरणादायी : रमाकांत कोंडुसकर

Spread the love  बेळगाव : थायलंड पटाया येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगांवचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *