बेळगाव : सीईटी परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याला विवस्त्र करून जानवे कापून काढल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी बेळगावात ब्राह्मण समाजाने शक्तिप्रदर्शन करून घटनेचा निषेध केले. जानवे कापण्यात आलेल्यांना केवळ निलंबितच नाही, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
बेळगाव शहरातील ब्राह्मण समाजातर्फे कृष्ण मठाचे श्रीनिवास होन्नीदिब्ब आचार्य, जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे, ॲड. एस. एम. कुलकर्णी, आर. एस. मुतालिक आदींच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी कन्नड साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद तसेच बेळगाव शहर परिसरातील विविध ब्राह्मण व हिंदू संघटनांसह ब्राह्मण समाजाचे शेकडो स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.
चन्नम्मा सर्कल, कित्तूर, बेळगाव येथे जमलेल्या ब्राह्मण समाजाने जानवे कापणाऱ्यांविरोधात आक्रोश व्यक्त केला. इतकेच नाही तर हीच प्रवृत्ती अशीच सुरू राहिल्यास येत्या काळात ब्राह्मणांना परशुरामाचे रूप धारण करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. जानवाला हात लावला तर तलवार काढावी लागेल, असा इशारा काही जणांनी दिला.
ब्राह्मण समाजाने संस्कृतीचे प्रतिक आणि धर्माचे पवित्र असलेले जानवे दाखवून निषेध केला. शहरातील चन्नम्मा सर्कलमध्ये जमलेल्या ब्राह्मण समाजाने जानवे हातात घेऊन ‘जानवे वाचवा, ब्राह्मण वाढवा’ असे फलक घेऊन निषेध केला. आंदोलकांनी काही काळ मानवी साखळी करून रस्ता आडवून धरला. आंदोलकांनी हिंदुत्वविरोधी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
ब्राह्मण समुदायाच्या मोर्चाच्या आगमनाची वर्दी मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन स्वतःहून जातीने मोर्चाला सामोरे गेले. त्यावेळी श्रीनिवास होन्नीदिब्ब आचार्य, आमदार अभय पाटील, राम भंडारे, ॲड. एस. एम. कुलकर्णी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी रोशन यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.