बेळगाव : बेळगावात पाणीसमस्या पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर आ. अनिल बेनके यांनी सोमवारी एल अँड टी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सभा घेऊन तातडीने पाणी समस्या सोडवा, नाहीतर झाडाला बांधून मारेन अशी तंबी दिली.
बेळगाव शहरात पुन्हा एकदा पाणी समस्या उदभवली आहे. गेल्या ८ दिवसांपासून शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आ. अनिल बेनके यांनी सोमवारी पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांची नगरसेवकांसोबत महापालिकेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नगरसेवकांनीही पाणी पुरवठ्याबाबत जोरदार तक्रारी केल्या. शहराच्या काही भागात 12 तर काही भागात 20 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. अशा परिस्थितीत लोकांनी पाण्याविना जगायचे कसे असा प्रश्न त्यांनी केला.
यावेळी आ. अनिल बेनके यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झडती घेतली. सुरळीत पाणी पुरवठ्याबाबत यापूर्वी दहा-बारा वेळा बैठक घेतल्या आहेत. केवळ ५ टँकर आहेत, उरलेले टँकर्स कुठे गेले असा प्रश्न त्यांनी केला. काम होणार नाही म्हणून तुम्ही का सांगत नाही? तुम्ही पैसे खर्च करा, जास्तीचे कामगार घ्या, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. पाणीच नसेल तर गोष्ट वेगळी, पण हिडकल डॅममध्ये पाहिजे तेवढे पाणी आहे, 20 कोटी रुपये खर्च करून पंप बसवला आहे. तरीही सुरळीत पाणी पुरवत नाही मग कसे? पाणी पुरवठा सुरळीत करा, जर यापुढे लोकांकडून पाण्याची तक्रार आली तर तुम्हाला झाडाला बांधून चोप देईन अशी तंबी एल अँड टीच्या अधिकाऱ्यांना आ. अनिल बेनके यांनी दिली. महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, नगरसेवक, एल अँड टी कंपनीचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. एकंदर आ. अनिल बेनके यांनी पाणी पुरवठ्यावरून एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला आहे. निदान यापुढे तरी बेळगावचा पाणी पुरवठा सुरळीत होतो का हे पहावे लागेल.
Check Also
मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!
Spread the love कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …