बेळगाव : बेळगावपासून जवळच असणार्या सांबरा या विमानतळाने राज्यातील तिसर्या क्रमांकाची व्यवसाय पर्वणी साधत उत्तम कामगिरी सिद्ध केली आहे. आता नजीकच्या काळात बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मिती करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला मात्र, आतापर्यंत धूळ खात पडलेला हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे. यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री मुर्गेश निराणी यांनी हा प्रस्ताव सरकारसमोर मांडला आहे. राज्य सरकारसमोर कित्तूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीचे उद्दिष्ट मांडण्यात आले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून पुढील पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 12 वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2008 मध्ये व्हीजन 2020 हा आराखडा तयार करण्यात आला होता. सध्याचे बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी यावेळी बेळगावात आंतरराष्ट्रीय विमानतळाची कल्पना मांडली होती. त्यानंतर विविध उद्योग संघटना आणि व्यावसायिक प्रतिनिधी यांच्याशी चर्चेनंतर याबाबत प्रस्तावासाठी प्रयत्न झाले होते. बेळगाव आणि हुबळी यांच्यामध्ये एक मोठे विमानतळ निर्माण करण्याचा तो प्रस्ताव होता. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने उडान ही योजना जाहीर केली आणि लहान विमानतळांच्या प्रगतीचे कार्य सुरू झाले. यामधून बेळगाव म्हणजेच सांबरा विमानतळाचे विकसन झाले. आता विमानप्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामधून भविष्यात बेळगावात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची चर्चा पुन्हा गतिमान झाली आहे.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/03/images15-600x330.jpg)