शेतकरी चिंतातूर; मगरीची लहान 16 पिल्ले वन विभागाकडे सुपूर्द
चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीच्या किनारी अनेक ठिकाणी शेतमळ्यामध्ये पुराचे पाणी येऊन साठते. वर्षभर ते पाणी तसेच राहते त्या ठिकाणी असणाऱ्या दलदलीचा आणि चिखलाचा आधार घेऊन या ठिकाणी अनेक मगरीने वास्तव्य केले आहे. त्यातील कालचेच जिवंत उदाहरण म्हणजे माजी नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या जुन्या पडक्या विहिरीमध्ये एक मोठी मगर गेल्या दोन वर्षापासून वास्तव्यास आहे. आता त्या मगरीने किमान 25 ते 30 पिलांना जन्म दिला असून त्यापैकी 16 पिलांना ऍड. डी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मगर बचाव मोहिमे अंतर्गत योजना आखून 16 पिल्लांना सुखरूप पकडण्यात आले. या मोहिमेमध्ये अभिजीत पाटील, दत्ता तपकिरे, दयानंद पाटील, होनसिद्ध घोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. आणि त्या सर्व पिलांना सुरक्षित ठिकाणी बंदिस्त केले. आज चिकोडी वनविभागाच्या अधिकारी जगदीश रक्कसगी यांच्याशी संपर्क साधून आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार बीट फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत तळवार, वाहन चालक भरमू कांबळे आणि वननिरीक्षक इमरान सनदी यांच्याकडे सर्व पिल्लांना अभिजीत पाटील यांनी अधिवासात सोडण्यासाठी सुपूर्द केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, मकरंद द्रविड, शेतकरी मित्र हालप्पा पुजारी, संजू पुजारी, जयपाल मंगाजे, सुरेश मल्लांनावर, दयानंद पाटील उपस्थित होते. उपस्थितांनी वनाधिकाऱ्यांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित केले. शेतमळ्यामध्ये वास्तव्यास असलेल्या मोठ्या मगरींचे काय? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. कारण त्या मोठ्या मगरीपासून जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत त्या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक शेळ्या, मेंढ्या आणि कुत्री, मांजरे अशा पाळीव प्राण्यांचे शिकार या मगरीने केले आहे. त्यामुळे जीवित हानी होण्याची वाट वनविभाग पाहते काय? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. आतापर्यंत सदलगा शहरातील एका ही मागरीला पकडण्यात वन विभागाला यश आले नाही हे एक दुर्दैव म्हणावे लागेल. आता तरी ताबडतोब चिक्कोडी वनविभाग अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन शहर परिसरात अनेक ठिकाणी असणाऱ्या अनेक मगरींचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.