
बेळगाव : महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला गती मिळावी आणि महाराष्ट्र सरकारने अधिक प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली.
कोल्हापूर मुक्कामी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार साहेबांची भेट घेऊन सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा केली. यावेळी समितीच्या वतीने सीमाभागातील विविध प्रश्न तसेच सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.
बैठकीदरम्यान २९ जून रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आयोजित धरणे आंदोलनाची माहितीही शिष्टमंडळाने पवार साहेबांना दिली. यावर पवार साहेब यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तत्काळ चर्चा करून उच्चाधिकार समिती आणि तज्ज्ञ समितीची बैठक घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बेळगावसह सीमाभागात कन्नड सक्तीच्या अंमलबजावणीमुळे मराठी भाषिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीबाबतही यावेळी चर्चा झाली. सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना आणि स्थानिक परिस्थितीची माहिती शिष्टमंडळाने पवार साहेबांना दिली. सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र सरकार सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा युक्तिवाद प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, अशी भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली.
या भेटी दरम्यान समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्यासह सुहास हुद्दार, उमेश पाटील आणि विनोद अंबेवाडीकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta