
मी दीड वर्षांचा असताना बापू मला आत्त्याकडं कोल्हापूरला सोडून गेले. गावात पोर राहिलं तर शहाणं होणार नाही म्हणून हेमंतला कोल्हापूरात ठेवला पाहिजे! जीजी बापूनं ह्रदयावर दगड ठेवला अन् नुकत्याच चालायला आणि बोलायला शिकलेल्या आपल्या पहिल्या अपत्याला आपल्या बहिणीकडं मला सोडलं. का तर याच मोठ्या बहिणीनं बापूंना ही शिकवून शहाणं केलं होतं. बापूंनी मला माईसाहेबांच्या बालमंदीरात प्रवेश मिळवून दिला. पिवळी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून आत्त्याच्या कडक निगराणीत माझा शहाणं व्हायचा प्रवास चालू झाला.
दर रविवारी न चुकता कोल्हापूरला यायचं आणि मला शिवाजी चौकातलं इम्पिरियलचं रोझ-व्हॅनिला खाऊ घालून परत आत्याकडं सोडायचं हा बापूंचा परिपाठच! देवाचं फूल चुकलं असेल पण बापू कधी चुकले नाहीत. बापूंची आणि माझी त्यावेळची ओळख म्हणजे मला रविवारी आईसक्रीम देणारा आणि न चुकता माझ्यासाठी मटन घेऊन येणारा माणूस एवढीच मर्यादीत!
काळ सरत गेला. मी तिसरीत असताना आत्त्या पन्हाळ्याला रहायला गेली. मग बापू गाव सोडून जीजी ला घेऊन माझ्या शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. एकत्र कुटुंबातून कुटुंब सोडून किंवा त्यावेळच्या भाषेत घर फोडण्याचा गुन्हा करून माझा बाप ऊभ्या कपड्यानिशी घर सोडून माझ्यासाठी कोल्हापूरात शुक्रवार पेठेत रहायला आला.
बापूंची एकंदरीत इमेज म्हणजे एकदम शीघ्रकोपी आणि करारी माणूस. गावाकडं सगळी बापूंना फार घाबरायची. बापूंनी सांगीतलं तेच फायनल होतं. मग मी ही तसाच घाबरू लागलो. पर्यायानं बापूंचा आणि माझा संवाद केवळ प्रगतीपुस्तकावरच्या सहीपुरताच मर्यादीत होत गेला. कोल्हापूरला आल्यावर पीयरप्रेशरमुळं मी बापू जीजींना पप्पा आणि मम्मी म्हणून संबोधायला लागलो पण बापू हे बापूच राहीले. फक्त मम्मीचं मात्र ‘ए मम्मे..’ असं कोल्हापूरीकरण होत पुढे ‘आई’ वर येऊन थांबलं.
बापू कामात बीझी असायचे. मग मला अभ्यासाला बसवण्याच्या महत्प्रयासी कामाची जबाबदारी जीजीवर आली. जीजी चौथी शिकलेली पण अतिशय सुशिक्षित आणि सुजाण बाई! परीक्षेला काय करावं लागतं, तर ‘ऊत्तरं लिहावी लागतात’ एवढं साधं समीकरण मनात ठेवून मी रोज पाच धड्यांखालची प्रश्नोत्तरं लिहूपर्यंत मला जेवायला द्यायचं नाही हा बापूंचा आदेश ह्या धर्मपत्नीनं वर्षानुवर्षे तंतोतंत पाळला.
प्रगतीपुस्तकाचा प्रश्न सुटला कारण शाळेत पहिला नंबर वगैरे माझ्या अंगवळणी पडू लागला होता. एकदा हिंदीचे सर घरी आले आणि त्यांनी सांगितलं की हेमंत टिळक विद्यापीठाच्या परीक्षेला बसत नाही म्हणतोय कारण वडील नको म्हणतात म्हणून! खोटं बोललो म्हणून बापूंनी अंग सूजूपर्यंत फोकळून काढला. रागातच परीक्षेला बसलो, परीक्षेत पहिला आलो, प्रमाणपत्र दाखवायला गेलो तर जवळ घेऊन कळवळून फक्त एवढंच म्हणाले, ‘भैय्या मार्क महत्वाचे नाहीत रे, फक्त कधी खोटं बोलू नको, त्याची गरज नसते!’
त्या दिवशी बापूंनी मला दोन नियम घालून दिले जे मला आयुष्याला पुरून ऊरलेत;
पहिला, ‘खोटं बोलायचं नाही’ आणि दुसरा; ‘पहिला नियम कधीही मोडायचा नाही.’
पण त्या दिवसानंतर बापूंनी मला कधी ना प्रगतीपुस्तक विचारलं ना अभ्यास कर म्हणून सांगीतलं. ‘हेमंत जेवला का’ हा एकच प्रश्न ते आयुष्यभर आईला विचारत राहीले.
माझा शैक्षणिक प्रवास माझ्या ऊनाड भानगडींसोबत खाचाखळग्यातून पुढे जात राहिला आणि बापू मात्र काहीही न बोलता ते धक्के पचवत राहिले. मी तरूणाईच्या मस्तीत दुर्लक्ष करत राहिलो.
डीगरी झाल्यावर डोळ्यासमोर एकदम अंधारी आली. आता पुढं काय; या प्रश्नाला ऊत्तर नव्हतं. मी सगळं सोडून कोल्हापूरात केबल चालवू लागलो. बापूंनी एक दिवस मला सांगीतलं, ‘भैय्या, तू कलेक्टर व्हायच्या लायकीचा पोरगा, का नसते उपद्व्याप करत फिरत असतो? असं काहीतरी कर की जगानं तुला मधुकरचा मुलगा म्हणून न ओळखता मला हेमंतचा बाप म्हणून ओळखावं.’
ते शब्द जिव्हारी लागले,
म्हटलं आता कलेक्टर होऊन दाखवायचंच!
बॅग ऊचलली आणि थेट मुंबई एसआयएसी गाठलं..
युपीएससीला भारतात बावन्नावा आलो म्हणून घरी फोन आला. बापू मटकन खालीच बसले. मी विचारलं, ‘बास का?’
माझे दोन्ही हात हातात धरून त्या दिवशी माझा बाप धायमोकलून रडला. ‘बास पोरा, माझं जगणं सार्थक केलंस’ म्हणाला आणि थेट रिकामा डबा घेऊन मटन आणायला बाहेर पडला.
माझ्यावरचं प्रेम दाखवायची एकच व्यवस्था माझ्या बापाला माहीत होती. मी कोल्हापूरला घरी पोहोचलो की ‘कसा आहेस’ म्हणून कधीही न विचारणारे बापू माझा दंडवत पूर्ण व्हायच्या अगोदर थेट डबा घेऊन मटन आणायला बाहेर. आमच्यातला हाच काय तो सर्वात अर्थपूर्ण संवाद आजतागायत अखंड चालू राहीला.
कोल्हापूरातले वडील लोक पण अचाट असतात. स्वतःच्या पोराची खुशाली त्याच्या आईमार्फत किंवा फारच झालं तर मित्रांना विचारतात. ‘कसे आहेत तुमचे मित्र? सांगा त्यांना आम्ही विचारलं होतं म्हणून!’ हे कोल्हापूरच्या वडील लोकांचं पक्कं वाक्य. ‘काय रे हेमंत कसं चाललंय तुझं?’ असं थेट विचारणं म्हणजे आपल्याच पोराच्या कर्तृत्वावर जणू शंका घेण्यासारखं वाटत असावं या आबा मंडळींना. दया आणि बंटी नशीबवान म्हणायच्या. बापूंच्या बरोबर तासनतास गप्पा मारत बसायच्या.
तुमच्याशी गप्पा मारायचं, तुमच्यासोबतही घाबरत घाबरत का होईना पण एखादा चीअर्स करायचं राहूनच गेलं बापू…
अंजलीचं डॅाक्टर असणं, ती आमदार असणं हे त्यांना
मोठं कौतुकाचं! मल्हार अमेरिकेत अर्थशास्त्र शिकायला गेला म्हणून गावभर छाती फुटूपर्यंत सांगायचे. रखमा दोन महिन्याची असताना तिचं ॲापरेशन चालू होतं तर रखमा बाहेर येऊ पर्यंत ॲापरेशन थिएटरच्या दारात देवाला साकडं घालत एकटाच बसलेला माझा बाप आजही मला तसाच दिसतोय.
बापूंचं प्रेम, त्यांची कळकळ, त्यांनी खाल्लेल्या खस्ता हे सगळं एका अदृश्य कल्पवृक्षाची फक्त एक अजाणती सावली होती. त्या सावलीत खेळताना झाडाचा किंवा त्याच्या अस्तित्वाचा, आम्हाला त्रास होऊ नये म्हणून झाडानं झेललेल्या असंख्य ऊनपावसाळ्यांचा विचारच कधी मनात आला नाही. वेळ पडली तर त्याच झाडाच्या सुकलेल्या पानांनी आम्हाला शेकोटीची ऊब ही दिली पण जळणाऱ्या पानांची कधी कदरच झाली नाही हो.
पावसाळ्यात हातकणंगल्याच्या स्टेशनवरून धाकट्याओढ्यातून घरी जाताना माझ्या पायाला चिखल काटे लागतील म्हणून मला खांद्यावर घेऊन स्वतः चिखल काटे तुडवणाऱ्या माझ्या बापाला खांदा द्यावा लागेल हा विचारही मला कधी शिवला नव्हता. बापू रिटायर झाले अन मी आयपीएस झालो. माझ्या रिटायरमेंटला बापूंना घेऊन जायचं माझं स्वप्नं त्यांनी डाव असा अर्ध्यावर मोडल्यानं तसंच राहीलं आता!
काल रक्षाविसर्जनाच्यावेळी राखेतून त्यांच्या भुगा झालेल्या अस्थी शोधताना अचानक एका भयाण पोकळीची भयंकर जाणीव स्पर्शून गेली. पाहता पाहता ती अंधारी पोकळी माझं अस्तित्वच व्यापून गेली. मी मात्र माझ्यासाठी आयुष्यभर कणकण झिजलेल्या त्या सत्त्याऐंशी वर्षं होरपळलेल्या अस्थींमधे बापूंना शोधायचा केविलवाणा प्रयत्न करत राहिलो.
बापू, छप्पन्न वर्षांचा मी, कालपर्यंत स्वतःला तरूणच समजायचो ते तुमच्या असण्यामुळं हे मला आज जाणवतंय. स्मशानात मल्हार माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होता आणि मला मी बाप असल्याची जाणीव करून देत होता. मी आता कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं हा प्रश्न माझं मन मला विचारत होतं. तुमच्या दुखण्याचा आम्हाला कुणाला त्रास होऊ नये म्हणून संदीप डॅाक्टरच्या प्रयत्नांना ही ओव्हरटेक करून अगदी चालता चालता ठरवून गेल्यासारखे गेला तुम्ही.
वेळ जाईल, काळ जाईल, दुःख आणि शोक हळू हळू विरून जाईल हेच जगरहाटीचं तत्व! पण तुमची ती माझ्या कल्याणाचा सतत ठाव घेणारी करडी नजर मात्र अशीच स्वर्गातूनही माझ्यावर, पोरांवर आणि आम्हासर्वांवर लक्ष ठेवून राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
शब्द सापडायचे बंद झालेत आता.
राहीला आहे तो फक्त भावनांचा ऊमाळा आणि आठवणी…
चीअर्स बापू!
– हेमंत निंबाळकर
S/o मधुकर निंबाळकर, कोल्हापूर
Belgaum Varta Belgaum Varta