
विद्यार्थी व कामगारांचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा
खानापूर : गर्लगुंजी येथील श्री माऊली देवी यात्रा काळात तसेच यात्रेनंतरही बेळगाव–गर्लगुंजी आणि खानापूर–गर्लगुंजी या मार्गांवरील बसफेऱ्या वाढवाव्यात व सुरू असलेल्या बससेवा सुरळीत ठेवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर बेळगाव–गर्लगुंजी व खानापूर–गर्लगुंजी मार्गांवर बससेवेमध्ये अनियमितता निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे बेळगाव व खानापूर येथे प्रशिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व ग्राम पंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील यांनी डेपो मॅनेजर व डीटीओ, बेळगाव यांना पूर्वीच कल्पना दिली होती. त्यानंतर काही प्रमाणात बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली होती.
मात्र, तालुका व जिल्ह्यातील विविध यात्रा आणि इतर कारणांमुळे काही बसफेऱ्या अधूनमधून रद्द केल्या जात असल्याने पुन्हा प्रवाशांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर डीटीओ व बस डेपो व्यवस्थापक संतोष यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात माऊली देवी यात्रा काळात या भागात अतिरिक्त बसफेऱ्या सुरू कराव्यात तसेच पूर्वीप्रमाणे नियमित बससेवा कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ट्युशन व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होणार नाही तसेच बेळगाव व खानापूर येथे कामानिमित्त जाणारा कामगार वर्ग वेळेत पोहोचू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, रामचंद्र लोहार, परशराम बेळगावकर, सतीश बुरुड आणि विजय लोहार उपस्थित होते.
दरम्यान, डेपो मॅनेजर संतोष यांनी या निवेदनाची दखल घेत बेळगाव बस डेपो क्रमांक 3 शी संपर्क साधला असून डीटीओ यांनीही यास मान्यता दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे यात्रा काळात बससेवा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta