कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सीमाप्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेळगावच्या शिवसैनिकांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी घडली. मात्र, त्यांनी केवळ निवेदनात्मक फलकांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
‘चलो कोल्हापूर’ आंदोलनात सहभाग
अमित शहा यांच्या कोल्हापूर भेटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने ‘चलो कोल्हापूर’चा नारा देत सीमाप्रश्नावर आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात बेळगावसह सीमाभागातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम तसेच संघटक तानाजी पावशे यांचा समावेश होता.
फलकांच्या माध्यमातून मांडली मागणी
शिवसैनिकांनी हातात “बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषकांचा प्रश्न तातडीने सोडवा” अशा आशयाचे फलक घेतले होते. कार्यक्रमस्थळी पोहोचून सीमाप्रश्नाकडे केंद्रीय गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
मात्र, सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून पोलिसांनी संबंधित शिवसैनिकांना ताब्यात घेतले आणि सुमारे एक तास पोलिस ठाण्यात ठेवले.
पडताळणीनंतर सुटका
पोलिस चौकशीदरम्यान शिवसैनिकांनी आपण कोणतेही आंदोलन, निदर्शने किंवा गोंधळ घालण्यासाठी नव्हे, तर सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन देण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या हातातील फलकही याच मागणीशी संबंधित असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सर्वांची सुटका केली.
Belgaum Varta Belgaum Varta