बेंगळुरू : बहुभाषिक अभिनेते व दिग्दर्शक प्रकाश राज यांच्याविरोधात बेंगळुरू येथील ४८व्या एसीजेएम न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या नावावर विविध राज्यांमध्ये एकापेक्षा अधिक ओळखपत्रे असल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी समन्स बजावले होते. मात्र, त्याला प्रतिसाद न दिल्याने न्यायालयाने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती. वकील दिलीप कुमार यांनी प्रकाश राज यांच्या नावावर कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आदी ठिकाणी एकापेक्षा अधिक ओळखपत्रे असल्याचा आरोप करत हलसूर गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित कारवाई न झाल्याचा दावा करत त्यांनी पोलीस आयुक्त तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली.
प्रकरणावर समाधानकारक कार्यवाही न झाल्याने अखेर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रकाश राज यांना समन्स बजावले होते. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत अंतिम न्यायालयीन निर्णय अद्याप झालेला नसून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta