
बेळगाव : खानापूर-जांबोटी रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी गुरुवार, दि. ३० एप्रिल ते ५ मे पर्यंत असे सहा दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावले आहेत. या काळात खानापूरहून येणारी वाहने पिरनवाडी, कुसळी, जांबोटी रोडवरून वळविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
खानापूर-जांबोटी रस्त्याचे काम सध्या सुरू असून या रस्त्याची रुंदी ७.७५ मीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘शोल्डर’ नसल्यामुळे सुरू असलेल्या वाहतुकीमुळे कामात अडथळे येत होते. त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सहा दिवस वाहतूक बंद ठेवण्याची विनंती राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
या विनंतीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पिरनवाडी, कुसमळी, जांबोटी या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, जिल्हा पोलीसप्रमुख व पोलीस आयुक्तांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta