बेळगाव : सरकारी शाळांमधील उपस्थिती व्यवस्थापन अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने शिक्षकांच्या फेस रिडिंग हजेरीनंतर आता विद्यार्थ्यांसाठीही ‘निरंतर’ ऍपद्वारे उपस्थिती नोंदविण्याची नवीन प्रणाली सुरू केली आहे. मात्र या नव्या व्यवस्थेचा पहिलाच दिवस अनेक तांत्रिक अडचणींमुळे गोंधळाचा ठरल्याचे चित्र राज्यभरातील शाळांमध्ये पाहायला मिळाले.
शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शिक्षकांनी ‘निरंतर’ ऍपवर लॉगिन करून विद्यार्थ्यांची उपस्थिती फेस रिडिंगच्या माध्यमातून नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु ऍपमधील तांत्रिक त्रुटी, सर्व्हर डाऊन होणे, तसेच अनेक ठिकाणी ऍप सुरूच न होणे अशा समस्यांमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
परिणामी, अनेक शाळांमध्ये सुमारे ७० ते ७५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविताना अडचणी निर्माण झाल्या. काही ठिकाणी शिक्षकांना वारंवार प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांचे फेस रिडिंग होत नसल्याने उपस्थितीची नोंद अपूर्ण राहिली.
विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक अचूक पद्धतीने नोंदविण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असली, तरी तिच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा सक्षम असणे गरजेचे असल्याचे मत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये इंटरनेट सुविधा मर्यादित असल्याने अशा डिजिटल प्रणालींच्या वापरात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
याशिवाय दररोज विद्यार्थ्यांची उपस्थिती फेस रिडिंगद्वारे नोंदविण्यासाठी शिक्षकांना मोबाईलचा अधिक वापर करावा लागणार असल्याने शाळेच्या नियमित शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचा शिक्षण विभागाचा उद्देश स्वागतार्ह असला, तरी अशा प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी मजबूत सर्व्हर व्यवस्था, स्थिर इंटरनेट सुविधा आणि तांत्रिक त्रुटींचे तातडीने निराकरण करणे आवश्यक असल्याची मागणी शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थिती नोंदणीची ही नवी प्रणाली खऱ्या अर्थाने यशस्वी ठरू शकेल.
Belgaum Varta Belgaum Varta