
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई यांचा 67 वा वाढदिवस शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाला.
श्री. गोपाळ देसाई यांचे बालपण कष्टात गेले. इच्छा असून देखील घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर भारतीय सैन्य दलात दाखल होऊन गोपाळ देसाई यांनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले सैन्य दलात सेवा बजावत असताना त्यांनी सुभेदार पदापर्यंत मजल मारली. देशाची सेवा करीत असताना कारगिल आणि श्रीलंका येथील युद्धात त्यांचा सहभाग होता. सेवानिवृत्तीनंतर देखील ते शांत बसले नाहीत. त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यात स्वतःला वाहून घेतले. आज ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहेत. त्यांनी 1 मे हा त्यांचा जन्मदिवस तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या फंडाला पाच हजार रुपयाची देणगी देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील आणि मध्यवर्ती समितीचे सदस्य राजाराम देसाई यांनी देखील महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दरवर्षी पाच हजार रुपये देणगी समिती फंडासाठी देण्याचे जाहीर केले आहे. यावेळी खानापूर तालुका समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी, रणजीत पाटील, अभिजीत सरदेसाई, अमृत शेलार, परशुराम पाटील, संजीव पाटील, सुनील पाटील, मारुती गुरव, नारायण देसाई, यशवंत पाटील, गणपती पाटील, देवाप्पा पाटील, कृष्णा पाटील यांनी गोपाळ देसाई यांना शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta