कर्नाटक राज्य रयत संघटनेची मागणी : तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
निपाणी (वार्ता) : जून महिना संपत आला तरीही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणी सापडले आहेत. सोयाबीनचे इतर पिके वाळत असून नदीपासून पाणी योजना राबवलेल्या गावातही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने वेदगंगा आणि दूधगंगा नदीत पाणी सोडून शेतकऱ्यासह नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता.२०) तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
राजू पोवार म्हणाले, जून महिन्यात कडक ऊन पडत आहे. ढगाळ वातावरण होऊनही पाऊस झालेला नाही. पहिल्या पावसातच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतर पिकांची टोकननी केली आहे. पण नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. विहिरी आणि कुपनलिकांनाही पाणी कमी झाले आहे. त्यामुळे सोयाबीन उसासह पिके वाळत असून पाटबंधारे खात्याने याची दखल घेऊन तात्काळ नदीत पाणी सोडण्याची मागणी केली.
तहसीलदार सुरेश मुंजे यांनी संघटनेच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ पाटबंधारे विभागाचे अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून पाणी सोडण्याची विनंती केली आहे. याशिवाय आथणी येथील पाटबंधारे विभागाचे प्रवीण पाटील यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष सर्जेराव हेगडे, एकनाथ सादळकर, सूर्याजी पोटले, आनंद गायकवाड, प्रा. एच. बी. ढवणे, किसन पोटले, शिवाजी वाडेकर, अमोल चौगुले, मधुकर पाटील, रामचंद्र मगदूम, मारुती मजगे बबन जामदार, बाबासाहेब पाटील, मारुती पाटील, पिंटू लाड, अर्जुन नाईक, सागर पाटील, अमोल चौगुले, रामचंद्र मगदूम, मारुती मजगे, मधुकर पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta