
दरही नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत
निपाणी (वार्ता) : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने टोमॅटोची लागवड केली असली, तरी वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे या पिकाला मोठा फटका बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. सुरुवातीला चांगल्या उत्पन्नाची आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना आता उत्पादन घटल्याने आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय बाजारात दरही नसल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या भागातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. बी-बियाणे, खत, औषधे, मजुरी, पाणी व्यवस्थापन यासाठी मोठी खर्च झाला आहे. मात्र गेल्या महिन्यापासून वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. फळधारणा कमी होणे, झाडे कोमेजणे आणि उत्पादन घटणे यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
यापूर्वी बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने भाव फारसा मिळत नव्हता. त्यावेळी उत्पादन जास्त असल्यामुळे काही प्रमाणात तोटा सहन करावा लागला. मात्र आता उन्हामुळे मालाची आवक कमी होत असतानाही दरामध्येअपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
सव्वा एकरात टोमॅटो लावला आहे. जवळपास एक लाख रुपयांचा खर्च झाला. आता उन्हामुळे उत्पादन घटत आहे. बाजारात दरही समाधानकारक नाहीत. खर्च निघून किती नफा होईल, हे सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया बेनाडी येथील युवा शेतकरी सतीश पाटील यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta